प्रयाग चिखली, वार्ताहर
Kolhapur News : करवीर तालुक्यातील वरणगे येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून इच्छुकांच्यात तंटा होऊन प्रचंड गोंधळ शिवीगाळ, दहशत आणि हाणामारी झाल्याची घटना आज वरणगे येथे घडली. येथील भैरवनाथ मंदिरमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीवरून गावातील एकाच गटात दोन-तीन अंतर्गत गट पडले आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला. वादाचे पर्यावसन खुर्च्या, तांब्या फेकून मारून एकमेकाला जखमी करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने अवाक् झालेल्या ग्रामस्थात दिवसभर या घटनेची चर्चा चालू होती.
करवीर तालुक्यातील वरणगे येथील राजकारणात अलीकडे काही छोट्या गटांनी एकत्र येऊन राजकारणात एक भक्कम पर्याय निर्माण केला. या एकत्रित गटाकडे सध्या गावातील ग्रामपंचायत सेवा संस्था दूध संस्था अशा सर्वच संस्थांची सत्ता आली आहे. साधारण तीन-चार गट एकत्र आल्यामुळे हा गट भक्कम झाला आहे. गतवर्षी विरोधकांना भक्कम पर्याय व्हावा या दृष्टीने गावातील करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य तानाजी आंग्रे, कुंभी कारखान्याचे माजी संचालक- बळवंत पाटील येथील हनुमान सेवा संस्थेचे चेअरमन- रामकृष्ण पाटील, माजी सरपंच -नामदेव पाटील माजी सरपंच- विलासराव पाटील आदी स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन या गटाची बांधणी भक्कम पद्धतीने केली होती. पर्यायाने गावातील सर्व सत्ता काबीज करणे या गटाला सहज शक्य झाले. मात्र कारभारी वाढल्यामुळे सुरुवातीपासूनच या बड्या गटात या ना त्या कारणावरून धुसपुस निर्माण होत गेली.
गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गेली अनेक वर्षे पांडुरंग पाटील हे कार्यरत होते.आज तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड नव्याने घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली. या पदाबाबत गटातील दोन-तीन अंतर्गत गटाकडून तिघांची नावे चर्चेत होती. मात्र, तंटामुक्त अध्यक्ष आपल्याच गटाचा व्हायला पाहिजे अशी आग्रही मागणी अंतर्गत तीन गटांकडून झाली. यावेळी अध्यक्ष आमचाच या आग्रहातून दोन गटात तंटा निर्माण झाला. या तंट्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी एकामेकाला खुर्च्या फेकून मारणे, हातात येईल ती वस्तू फेकून मारणे असे प्रकार घडले. एका कार्यकर्त्याने तांब्या फेकून मारला मात्र, नेम चुकल्यामुळे दुसराच जखमी झाला. यावेळी प्रचंड गदारोळ आणि प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
तंटामुक्तीच्या निवडी वेळीच तंटा निर्माण होऊन हाणामारी झाल्याने गावामध्ये दिवसभर या घटनेची चर्चा रंगली. दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.या घटनेमुळे या एकत्रित येऊन निर्माण झालेल्या बड्या गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे निष्पन्न झाले. याचे पडसाद गावातील भविष्यातील राजकारणावर नक्की होणार असल्याचे बोलले जात आहे.
कारभारी वाढले रस्सा बिघडला….
तीन चार गट एकत्र आले गावातील सत्ता काबीज केली मात्र, कारभारी वाढल्याने प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या, अनेक दिवसांची खदखद होतीच. या घटनेची आज आचारी वाढले आणि रस्सा बिघडला.. अशी चर्चा ग्रामस्थांच्यात दिवसभर होती.