नोकरीत कायमस्वरुपी घ्या, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
दलितांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. एससीपी-टीएसपीसारख्या योजना केवळ कागदावर आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत दिली जात नाही. स्वच्छता व इतर विभागात काम करणाऱया दलित कर्मचाऱयांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले जात नाही. दलितांवर अन्याय होत आहे. हा अन्याय तातडीने दूर करा, या मागणीसाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता कर्मचारी म्हणून कंत्राटी पद्धतीनेच आम्ही काम करत आहे. दलित समाजातील नागरिक मोठय़ा संख्येने यामध्ये काम करतात. त्यामुळे आरक्षणानुसार त्यांना नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेतले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये दलितांच्या विरोधात अपप्रचार केला जात आहे. रोहित चक्रतीर्थ यांनी पुस्तकामध्ये जो उल्लेख केला आहे, तो पूर्ण चुकीचा आहे. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
दलितांवर अनेक ठिकाणी अत्याचार, अन्याय होत आहेत. ते अत्याचार निर्मूलन करण्यासाठी न्या. सुभाष आडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या शिफारसीनुसार दलितांवर अन्याय, अत्याचार दूर करावा, असेही या निवेदनात म्हटले आहे. कन्नड साहित्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी, कर्नाटक दलित संघर्ष समितीचे सिद्धाप्पा कांबळे, महादेव तळवार, गौतम पाटील, आर. जी. कांबळे, नागेश कामशेट्टी, नटराज मोरकर, संतोष कांबळे, एन. सी. तळवार, राजू मादार, बी. टी. मेत्री, सुरेश कोलकार, विजय मादार यांच्यासह दलित संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.