वाराणसी / वृत्तसंस्था
येथील काशी विश्वनाथ मंदिर परिसरात ज्ञानव्यापी विवादाची सुनावणी 12 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सोमवारच्या सुनावणीत मुस्लीम पक्षकारांनी त्यांच्या बाजूचा पुढचा भाग मांडला. पुढील सुनावणीतही तेच पक्षकार त्यांची बाजू पूर्ण करणार आहेत. त्यानंतर हिंदू पक्षकार त्यांचा पक्ष समोर ठेवणार आहेत. या परिसरातील श्रृंगारगौरी मंदीरात हिंदूंना पूजाअर्चा करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी एका आवेदनाद्वारे चार हिंदू महिलांनी केली आहे.
हे प्रकरण सुनावणीयोग्य नाही, असे मुस्लीम पक्षकारांचे म्हणणे आहे. त्यासंबंधीचे आधार ते पुढील सुनावणीत स्पष्ट करणार आहेत. तर ज्ञानवापी हे हिंदू मंदिरच असून ते तोडून मुस्लीम आक्रमकांनी त्यांची मशीद उभी केली आहे. त्यामुळे या तथाकथित मशिदीवर आणि त्या परिसरावर हिंदूंचाच अधिकार आहे, असे हिंदू पक्षकारांचे म्हणणे आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन या परिसरात व्यापक सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात हिंदू मंदिर व देवदेवतांच्या मूर्ती तसेच हिंदू धर्मचिन्हे आढळून आल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वेक्षण अहवाल न्यायलयाला सादर करण्यात आला असून त्याचा काही भाग मिडियावर प्रसारितही झाला आहे.
जलाभिषेक अनुमतीची मागणी
ज्ञानवापी परिसरातील तलावात पुराणकालीन शिवलिंग सापडल्याचे हिंदू पक्षाचे म्हणणे आहे. तर मुस्लीम पक्षाने तो कारंजा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यासंबंधीही निर्णय सुनावणीच्या पुढील टप्प्यात अपेक्षित आहे. हिंदू पक्षकारांपैकी एक राखी सिंग यांनी मान बहादुर सिंग, शिवम गौड आणि अनुपम द्विवेदी असे तीन नवीन विधिज्ञ नियुक्त केलेले आहेत. परिसरात आढळून आलेल्या शिवलिंगावर श्रावण महिन्यात जलाभिषेक करण्याची अनुमती देण्यात यावी, अशी मागणीही हिंदू पक्षकारांकडून न्यायालयात करण्यात आली आहे.
प्रकरण रद्द करण्याला विरोध
1991 मध्ये केंद्र सरकारने पूजा अर्चा कायदा लागू केला होता. त्यानुसार अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरण वगळता तशा प्रकारच्या अन्य प्रकरणांमध्ये सध्याचीच स्थिती राखण्यात आली पाहिजे, अशी तरतूद आहे. त्यामुळे हा कायदा लागू करुन ज्ञानवापी प्रकरण रद्द व्हावे, अशी मुस्लीम पक्षकारांची मागणी आहे. तथापि, हिंदू पक्षकारांनी ही मागणी फेटाळली असून हे प्रकरण या कायद्याच्या कक्षेबाहेर असल्याचे प्रतिपादन आतापर्यंतच्या सुनावणीत केले आहे.
नव्या पक्षकारांचे अर्ज
ज्ञानवापी प्रकरणात आणखी 10 नवे पक्षकार जोडले जात आहेत. त्यांनी त्यांची आवेदनपत्रे सादर केली आहेत. नव्या पक्षकारांमध्ये प्राचीन मूर्ती स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वरनाथ या मूर्तीचे सहकारी विजय शंकर रस्तोगी, श्रीकाशी विश्वनाथ मंदीराचे माजी महंत डॉ. कुलपती तिवारी यांचा समावेश आहे.
धरहरा परिसर सुनावणीही लांबणीवर
ज्ञानवापी प्रमाणेच धरहरा येथील मंदीर तोडून मशिद उभी करण्याचे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. याची सुनावणीही सोमवारीच होती. ती 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. हा परिसर बिंदुमाधव मंदिराचा आहे, असे हिंदू पक्षकारांचे म्हणणे आहे. राकेश पांडे, राजा आनंद ज्योती सिंह, शशिकांत यादव, हरिकेश गुप्त आणि श्रीपती मिश्र या विविज्ञांनी हे प्रकरण सादर केले आहे. औरंगजेबाच्या काळात बिंदुमाधव मंदीर तोडून मशिद बांधण्यात आली, याचे ऐतिहासिक पुरावे आहेत, असे या विधिज्ञांचे म्हणणे आहे.