कोल्हापूर प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून ‘तरुण भारत’ने मी नवदुर्गा या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना नऊ दिवस प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचे कार्य केल्याची भावना या उपक्रमात सहभागी महिलांनी गुरूवारी झालेल्या सन्मान सोहळय़ात व्यक्त केली.
नवरात्रोत्सव आणि नऊ रंग हा वेगळा संगम. या नऊ दिवशी महिला नऊ रंगांच्या साडय़ा परिधान करून या सणाला आगळय़ा वेगळय़ा पद्धतीने साजरे करत असतात. हाच धागा पकडून ‘तरुण भारत’ने ‘मी उर्जिता’च्या सह प्रायोजकत्वाच्या माध्यमातून शहरातील महिलांना नवरंगांचे व्यासपीठ ‘मी नवदुर्गा’ उपक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करून दिले. या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी नऊ दिवस नऊ रंगांच्या साडय़ा परिधान नवरंगांचा अविष्कार साकारला. ‘तरुण भारत’च्या युटय़ुब, फेसबूक व इन्स्टाग्रामवर नऊ दिवस ‘मी नवदुर्गा’ उपक्रमांतर्गंत नऊ रंगातील साडय़ांची छायाचित्रे प्रसिध्द केली. या सणाच्या निमित्ताने सहभागी महिला नऊ दिवस प्रेरणा आणि ऊर्जा लाभली. एकत्रित येऊन विचारांची देवाण-घेवाण करण्याचीही संधी मिळाली, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचण्याची संधीही लाभली, अशा शब्दात गुरूवारी झालेल्या प्रमाणपत्र वितरण सोहळय़ात सहभागी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भागीरथी महिला संस्थेच्या सदस्य संगीता खाडे, शरयू भोसले, सुषमा पाटील, शिवानी पाटील, सविता कोळी, अश्विनी पंडित, शोभा कोळी, शारदा पोटे यांच्यासह शाहू महाविद्यालयाच्या डॉ. सिंधू आवळे या सोहळय़ाला उपस्थित होत्या. या सर्वांना ‘तरुण भारत’चे निवासी संपादक मनोज साळुंखे, जाहिरात व्यवस्थापक (शहर) मंगेश जाधव, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, सोशल मीडिया प्रमुख राहुल गडकर, प्रतिनिधी अहिल्या परकाळे यांच्या हस्ते या उपक्रमातील महिलांना आकर्षक बक्षीस आणि प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
तरुण भारतच्या उपक्रमाविषयी भावना….
संगीता खाडे म्हणाल्या, ‘मी नवदुर्गा’ उपक्रम राबवून महिलांना नवरात्रोत्सवात उर्जा मिळाली. उपवास असूनसुध्दा महिला नवनवीन साडय़ा परिधान करून आपला फोटो काढण्यासाठी उपस्थित राहायच्या. ‘तरूण भारत’ कार्यालयात निमंत्रित करून भेटवस्तू आणि प्रमाणपत्र दिल्याने आमचा आनंद व्दिगुणीत केला आहे.
शरयू भोसले म्हणाल्या, दैनंदिन जीवनात महिलांना विविध अडचणी, समस्यांचा सामना करावा लागतो. कायदेविषयही माहिती नसते. तशी माहिती मिळावी, यासाठी ‘तरुण भारत’ने पुढाकार घ्यावा. कायद्याविषयक माहिती प्रसिद्ध करावी. सरकारी वकिलांचे दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करावेत.
शिवानी पाटील म्हणाल्या, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र नव्हे तर देशभरातील खाद्यसंस्कृती, सांस्कृतिक, सामाजिक चाली-रितींची देवाण-घेवाण व्हावी. यासाठी ‘मी उर्जिता’च्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ मिळवून द्यावे. त्याचा लाभ महिला सक्षमीकरणासाठी होईल.
शाहू कॉलेजच्या डॉ. सिंधू आवळे म्हणाल्या, ‘मी उर्जिता’ उपक्रमातून देशभरातील सांस्कृतिक, सामाजिक पारंपारिक ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहचला पाहिजे. तसेच महिलांविषयक कायदे व अंमलबजावणी, सरकारी योजनापर्यंत पोहचण्याचे मार्ग या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहचवावे. यासाठी युटय़ुब, फेसबुक, इन्स्ट्राग्रामसारख्या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करता येईल.
सविता कोळी म्हणाल्या, यूटय़ूब चॅनलच्या माध्यमातून नवदुर्गांची नारीशक्ती तीनपेक्षा जास्त पिढय़ांनी वेगवेगळय़ा रंगांच्या माध्यमातून पाहिली. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील वेशभूषा, केशभूषा यातून महिलांना विविध प्रदेशातील संस्कृतीची माहिती मिळाली.
अरूंधती महाडिक यांच्या शुभेच्छा
या सोहळय़ाला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र त्यांनी उपक्रमाचे कौतुक करताना सोहळय़ाला दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.