प्रतिनिधी /बेळगाव
केएलएस गोगटे अभियांत्रिकी कॉलेजच्या एमबीए विभाग संस्थेचे इनोव्हेशन सेल, आयसीसी आणि जिन्सर्व (जीआयएनएसईआरव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच उद्योजकता परिषद घेण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिन्सर्वचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश हिरेमठ उपस्थित होते.
हिरेमठ म्हणाले, आजूबाजूला अनेक महत्त्वाकांक्षी संस्थापक आणि सर्जनशील स्टार्टअप टीम आपल्या पद्धतीने बाजारात उत्तम चालेल, अशा वस्तू किंवा कल्पना शोधण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्याच्या वर्षात नवे उद्योग चालू करण्यासाठी अनुकूल असे वातावरणही आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य जयंत कित्तूर म्हणाले, शिक्षण संस्थांमध्ये उद्योजक संस्कृती असणे हे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या सेमीस्टरपासूनच स्टार्टअपवर काम करण्यास उत्तेजन दिले जाणार असून पुढील वर्षांमध्ये त्याचे अनेक लोकांना नोकरी देणाऱया संस्थेत रुपांतर होईल, असे प्रयत्न राहतील.
संस्थेचे डीन डॉ. डी. ए. कुलकर्णी यांनी स्वागत केले. एमबीए विभागाने अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी जेव्हा आपले शिक्षण प्रत्यक्षात उतरवून समस्यांना यशस्वीपणे तोंड देतात, ते खरे शिक्षण आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. के.एस.एल. दास यांनी आपल्या उद्योगाच्या कल्पना मांडून तज्ञांकडून मार्गदर्शन मिळविण्याची उत्तम संधी या परिषदेतून विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे सांगितले. अध्यक्ष प्रमोद कठवी यांनी एमबीए विभागाचा हा उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले. यावेळी डॉ. संतोष सराफ, डॉ. किरण तनगोड, डॉ. वाणिश्री हुंदेकर, डॉ. ज्योती तलरेजा, डॉ. अमित चाटे, डॉ. प्रसाद कुलकर्णी, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचे विद्यार्थी उपस्थित होते.