रेल्वे बोर्डाचे स्पष्टीकरण : सीबीआय चौकशीची रेल्वेमंत्र्यांची घोषणा : मृतांचा आकडा 275
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली, बालासोर
ओडिशातील बालासोर जिह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात शेकडो प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे प्रभावित झालेली रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीचे कामही वेगाने सुरू आहे. भारतीय रेल्वेने रविवारी पत्रकार परिषद घेऊन या अपघाताचे कारण आणि इतर बाबींची माहिती दिली. त्यानुसार सिग्नल यंत्रणेतील त्रुटी आणि बिघाडामुळेच हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन आणि बिझनेस डेव्हलपमेंटच्या सदस्य जया वर्मा सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच रेल्वे अपघाताला जबाबदार असणाऱ्या संबंधितांची ओळख पटली असून याप्रकरणी सीबीआय तपास केला जाणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी केली.
अपघातावेळी कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने त्या गाडीचे सर्वाधिक नुकसान झाले. सुरुवातीला कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. त्यानंतर इतर गाड्यांचेही नुकसान झाले. अपघातावेळी कोरोमंडल एक्स्प्रेस 128 किमी प्रतितास वेगाने धावत होती. मालगाडीला धडकल्यानंतर रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या बोगी डाऊन लाईनवर कोसळल्या होत्या. यानंतर यशवंतपूर एक्स्प्रेस रेल्वेरुळावर पडलेल्या बोगींवर धडकली. यशवंतपूर एक्स्प्रेस 126 किमी प्रतितास वेगाने डाऊन मार्गावरून जात होती, असेही जया वर्मा सिन्हा यांनी स्पष्ट केले. तसेच मालगाडीमध्ये मोठ्या प्रमाणात लोखंड भरलेले असल्याने ती ऊळावरून घसरली नाही, असेही त्यांनी सांगितले.
अपघातानंतर रेल्वेने सर्वप्रथम मदत आणि बचावकार्य केले. त्यानंतर आता दुरुस्तीचे काम सुरू आहे. बहनगा स्टेशनवर 4 लाईन्स आहेत. यात 2 मुख्य मार्ग आहेत. लूप लाईनवर मालगाडी होती. चालकाला स्टेशनवर ग्रीन सिग्नल मिळाला होता. दोन्ही वाहने पूर्ण वेगाने धावत होती. प्राथमिक तपासात सिग्नलमध्ये गडबड झाल्याचे दिसून येत आहे. आम्ही रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या सविस्तर अहवालाची वाट पाहत आहोत, असे जया वर्मा यांनी सांगितले.
कुटुंबीयांचा खर्चही रेल्वे उचलणार
अपघातानंतर रेल्वे विभागाकडून हेल्पलाइन क्रमांक 139 उपलब्ध करण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेल्या किंवा प्राण गमावलेल्यांचे कुटुंबीय आम्हाला कॉल करू शकतात. या क्रमांकावर आमचे वरिष्ठ अधिकारी कॉलला प्रतिसाद देत आहेत. आम्ही जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या प्रवासी नातलगांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांचा प्रवास आणि इतर खर्च आम्ही करणार आहोत, असेही रेल्वे बोर्डाकडून जाहीर करण्यात आले.
दोन दिवसात रेल्वेसेवा पूर्ववत होणार
अपघातानंतर हैदराबाद, चेन्नई, बेंगळूर, रांची, कोलकाता आणि इतर ठिकाणांहून विशेष गाड्या चालवल्या जात असल्याचे अपघातस्थळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून मुख्य मार्गांपैकी एका मार्गावर रुळ टाकण्यात आले आहेत. आम्ही सर्व यंत्रणा कामाला लावली असून येत्या एक-दोन दिवसात या मार्गावरील रेल्वेसेवा पूर्णपणे सुरळीत होणार असल्याचा दावा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे.
आतापर्यंतच्या तपासानुसार, रेल्वे बोर्डाचे स्पष्टीकरण….
► सुरक्षा ही रेल्वेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पुराव्याशी छेडछाड होणार नाही आणि कोणत्याही साक्षीदारावर प्रभाव पडणार नाही याची आम्ही खात्री देतो. ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच गाडी पुढे सरकल्याचे गंभीर जखमी असलेल्या रेल्वे इंजिनचालकाने सांगितले.
► अपघातासंबंधी आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. ज्येष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. प्रथमदर्शनी असे दिसते की सिग्नलमध्ये समस्या आली असावी, परंतु आत्ताच आम्ही कशाचीही पुष्टी करू शकत नाही.
► ‘कवच’ ही भारतात बनलेली रेल्वेच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रणाली आहे. याची चाचणी खुद्द रेल्वेमंत्र्यांनी टेनमध्ये बसून केली आहे. हे उपकरण सर्व लाईन आणि टेनमध्ये बसवण्यासाठी वेळ आणि पैसा लागेल. आगामी काळात आपण त्याची निर्यातही करू शकू.
रेल्वेमंत्र्यांचे स्पष्टीकरण…
► रेल्वेच्या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण आणि अपघाताला जबाबदार असणाऱ्यांची ओळख पटली आहे. सध्या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीआरएस) अहवालानंतर सर्व तपशील सविस्तरपणे समजतील.
► मदत व बचावकार्य पूर्ण झाले आहे. नादुरुस्त झालेले ट्रॅक बुधवारपर्यंत पूर्ववत होणे अपेक्षित आहे. टेनच्या धडकेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे आपल्या नेटवर्कवर ‘कवच’ प्रणाली उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत आहे. या घटनेचा ‘कवच’ यंत्रणेशी काहीही संबंध नाही.
► ‘इलेक्ट्रॉनिक पॉईंट मशीन’ आणि ‘इंटरलॉकिंग’ प्रणालीतील बिघाडामुळे अपघात झाला. ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’मधील बदलामुळे यंत्रणा कोलमडली. इलेक्ट्रिक पॉईंट मशीन हे रेल्वे सिग्नलिंगचे एक महत्त्वाचे उपकरण असून ते रेल्वे सुरक्षितपणे चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
एनडीआरएफ जवानाने दिली अपघाताची पहिली माहिती
लाईव्ह लोकेशन कंट्रोल रूमला पाठवले
मोबाईल टॉर्चने जखमींना काढले बाहेर
(फोटो वापरणे : व्यंकटेश नावाने )
बालासोर :
एनडीआरएफच्या 39 वर्षीय व्यंकटेश नामक जवानाने सर्वप्रथम ओडिशा रेल्वे अपघाताची बातमी नियंत्रण कक्षाला पाठवली. हा जवान कोरोमंडल एक्स्प्रेसमधून रजेनिमित्त घरी जात होता. त्यांनी घटनास्थळाचे लाईव्ह लोकेशन कंट्रोल रूमला पाठवले. एनडीआरएफ जवानाने पाठवलेल्या व्हॉट्सअॅप लाईव्ह लोकेशनमुळे प्रथम बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. बचाव पथक येईपर्यंत व्यंकटेश यांनी मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली होती.
व्यंकटेश 2021 मध्येच सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) एनडीआरएफमध्ये सामील झाले आहेत. व्यंकटेश हे कोलकाता येथील एनडीआरएफच्या दुसऱ्या बटालियनमध्ये हवालदार आहेत. ते शुक्रवारी बंगालमधील हावडा येथून तामिळनाडूतील आपल्या घरी जात होते. अपघातावेळी त्यांचा कोच बी-7 रुळावरून घसरला होता, पण पुढे असलेल्या डब्यांशी त्यांची टक्कर न झाल्यामुळे ते बालंबाल बचावले.
अपघात होताच मला जोरदार धक्का बसला आणि नंतर मला माझ्या डब्यात काही प्रवासी पडताना दिसले. मी पहिल्या प्रवाशाला बाहेर काढले आणि त्याला रेल्वे ट्रॅकजवळच्या दुकानात बसवले. त्यानंतर मी इतरांच्या मदतीसाठी गेलो. मी कोलकाता कार्यालयात अपघाताचे काही फोटो आणि लाईव्ह लोकेशन पाठवले, त्यानंतर त्यांनी ओडिशातील स्थानिक प्रशासनाला घटनेची माहिती दिली, असे व्यंकटेश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दुर्घटनास्थळानजिकच्या मेडिकल दुकानाच्या मालकासह स्थानिक लोकच खरे तारणहार होते कारण त्यांनी पीडितांना शक्य ती सर्वप्रकारे मदत केली. अपघातानंतर अंधार झाला होता आणि जखमी आणि अडकलेल्या प्रवाशांना शोधण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनमधील बॅटरीच वापरावी लागली. बचाव पथक येईपर्यंत प्रवाशांना मदत करण्यासाठी स्थानिक लोकांनीही मोबाईल फोन आणि टॉर्चचा वापर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.