उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक अक्षरश: हैराण : तालुक्यातील तापमान 40 अंश सेल्सिअस
वार्ताहर /किणये
गेल्या चार-पाच दिवसांपासून तालुक्यात उन्हाच्या तीव्र झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. दिवसागणीक वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. शुक्रवार-शनिवारी तालुक्यातील तापमान 40 अंश सेल्सिअस इतके झाले होते. यामुळे पशू-प्राण्यांसह नागरिकांचा जीव कासाविस होऊ लागला आहे.
शीतपेयाकडे नागरिकांचा कल वाढला
कडक उन्हामुळे शीतपेय, आइस्क्रिम आदी खाण्यासाठी नागरिकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे तालुक्याच्या काही मुख्य बाजारपेठांमध्ये असलेल्या कोल्ड्रींक्स दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढलेली आहे. तसेच बेळगुंदी, हिंडलगा आणि सांबरा या मुख्य रस्त्यांच्या बाजूला काही ठिकाणी उसाच्या रसाची दुकाने आहेत. वाढलेल्या उष्णतेमुळे उसाचा रस नागरिक अधिक प्रमाणात पिताना दिसत आहेत. आईस्क्रिम व बर्फाचे गोळे विकणारे हेसुद्धा गावागावांमध्ये फिरू लागले आहेत. सध्या शाळकरी मुलांना सुट्ट्या असल्यामुळे या आइस्क्रिम व गोळे खाण्यासाठी बालचमूंची धावपळ दिसत आहे. उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. या हंगामात काही गावांमध्ये यात्रा व लग्नसमारंभ होत आहेत. या यात्रांना व लग्नसमारंभांना जाणाऱ्यांची मात्र कसरत होऊ लागली आहे. आठवड्याभरापूर्वी तालुक्याच्या काही भागात अगदी तुरळक प्रमाणात वळिवाचा पाऊस झाला. यानंतर मात्र वळिवाने हुलकावणी दिली आहे. दमदार वळीव पाऊस झाल्यास हवामानामध्ये गारवा निर्माण होऊ शकतो. त्यासाठी मोठ्या वळिवाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांसह सारेजण आहेत. वळीव पावसाच्या हुलकावणीमुळे शेतशिवारातील मशागतीची कामे खेळंबलेली आहेत. यातच तापमानात वाढ होत असल्यामुळे ग्रामीण भागातील जनताही कासाविस होऊ लागली आहे. यापूर्वी पंखा व एसीचा वापर ग्रामीण भागात अगदीच अल्पप्रमाणात होत होता. अलिकडे मात्र बरेचजण घरांमध्ये पंखा व एसीचा वापर करू लागले आहेत. वाढणाऱ्या तापमानामुळे जनजीवन हैराण झाले आहे. यामुळे सध्या दमदार वळीव पाऊस पडावा अशी अपेक्षा सर्व स्तरातील नागरिकांतून व्यक्त होऊ लागली आहे.