कृषीखात्याचा अंदाज, खरिपासाठी शेतकऱ्यांची धडपड : भात लागवडीचे क्षेत्र अधिक : मान्सून उशिरा असल्याने शेतकरी चिंतेत
बेळगाव : तालुक्यात खरीप हंगामात एकूण 52 हजार हेक्टरमध्ये पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आहे. याबाबत कृषीखात्याने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली आहे. शिवाय शेतकऱ्यांचीदेखील वेळेत पेरणी हंगाम साधण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. विशेषत: तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. त्यापाठोपाठ सोयाबीन, ऊस, कापूस, मका आणि ज्वारीचे देखील पेरणी होणार आहे. गतवर्षी तालुक्यात 48 हजार 500 हेक्टरात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र यंदा त्यामध्ये 4 हजार 500 हेक्टराची वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात यंदा पेरणी आणि लागवडीचे क्षेत्रदेखील वाढणार आहे. कृषीखात्याने खत, बियाणे आणि अवजारांचा योग्य तो साठा केला आहे. शिवाय तालुक्यातील काकती, उचगाव, हिरेबागेवाडी रयत संपर्क केंद्रात बियाणे पुरविण्यात आली आहेत. त्याबरोबर नंदिहळ्ळी, बेळगुंदी, मारिहाळ, मुतनाळ, मोदगा, हालगा, भेंडीगिरी, के के कोप्प, बडाल अंकलगी आदी भागात असलेल्या कृषी पत्तीन संघात बियाणे, खते आणि कीटकनाशके देखील पुरविली आहेत. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल 52 हजार हेक्टरात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी भात 25 हजार हेक्टर, सोयाबीन 9 हजार हेक्टर, कापूस 1200 हेक्टर, मका 500 हेक्टर, ज्वारी 500 हेक्टर यासह इतर बियाणांची लागवड आणि पेरणी केली जाणार आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे पेरणीचे उद्दिष्ट देखील बऱ्यापैकी पूर्ण झाले होते. मात्र यंदा मान्सून काहीसा उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. वेळेत पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र मान्सूनवरच पेरणीचे उद्दिष्ट ठरणार आहे.
तालुक्यात पेरणीचे उद्दिष्ट
- पिकाचे नाव उद्दिष्ट (हेक्टरमध्ये)
- भात ..25 हजार हेक्टर,
- सोयाबीन ….9 हजार हेक्टर
- कापूस ….1200 हेक्टर
- मका …..500 हेक्टर
- ज्वारी ……500 हेक्टर
बियाणांची कमतरता जाणवू देणार नाही
कृषी पत्तीन संघ आणि रयत संपर्क केंद्रात बी-बियाणे आणि खतांचा साठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार सवलतीच्या दरात बियाणांची खरेदी करावी. बियाणे आणि खतांची कमतरता जाणवणार नाही. याची काळजी खात्यामार्फत घेतली जाणार आहे.
– आर. बी. नायकर, (तालुका सहाय्यक कृषी अधिकारी)