केंद्रावरील ताण कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोबाईल अॅप
प्रतिनिधी / बेळगाव
राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जभरणा केंद्रांवर महिलांची झुंबड उडाली आहे. होणारी गर्दी लक्षात घेत शहरामध्ये महानगरपालिकेकडून आठ गृहलक्ष्मी अर्जभरणा केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. मनपा कर्मचाऱ्यांना मोबाईल अॅपवर अर्ज भरण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजना प्रारंभ केल्यापासून योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी होऊ लागली आहे. बेळगाव वन, ग्राम वन, बापूजी सेवा केंद्र याठिकाणी अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. शहरातील बेळगाव वन केंद्रांवर ग्रामीण भागातील नागरिकांसह शहरी भागातील नागरिकही गर्दी करीत आहेत. त्यामुळे केंद्रांवर ताण वाढला आहे. दिवसभर रांगेत राहूनही नागरिकांना अर्जभरणा करण्यास शक्य होत नाही. सर्व्हरडाऊनची समस्या असल्याने अर्ज भरण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे महिलांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे. याची दखल घेऊन सरकारकडून महानगरपालिकेच्या व्याप्तीतील नागरिकांसह इतर नागरिकांनाही सोयीचे व्हावे, नियोजित केंद्रावरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने मनपा कर्मचाऱ्यांना गृहलक्ष्मी अॅप देण्यात आले आहे.
त्यानुसार बेळगाव महानगरपालिका व्याप्तीत गृहलक्ष्मी अर्ज भरण्यासाठी मनपाकडून आठ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये 2, कोनवाळ गल्ली 1, अशोकनगर 1, रिसालदार गल्ली 1, गोवावेस 2 व स्मार्ट सिटी कमांड कंट्रोल 1 अशाप्रकारे आठ ठिकाणी अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर महानगरपालिकेकडून तीन ते चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना मोबाईल अॅपवर अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. महिलांनी आधारकार्ड, बँक पासबुक, आधारकार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर घेऊन जाणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर त्याचठिकाणी ओटीपी क्रमांक देण्यात येत आहे. त्यानुसार अर्ज भरल्याचे गृहित धरले जात आहे.
एपीएल कार्डधारकांची गैरसोय
गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी एपीएल, बीपीएल, अंत्योदय यांना सोय करण्यात आली आहे. मात्र अनेक एपीएल कार्डधारकांकडून ई-केवायसी करून घेण्यात आली नसल्याने एपीएल कार्डधारकांची गैरसोय होत आहे. ई-केवायसी करून घेण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. सदर कार्डधारकांची परवड होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या कार्डधारकांना सोय करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.