मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे आजच्या धकाधकीच्या, तीव्र स्पर्धेच्या गतिमान जीवनात ‘ताण’ हा शब्द सावलीसारखाच सर्वांसोबत असताना दिसतो. ताण हा रोग नाही तर ती एक अवस्था आहे परंतु त्याचे प्रमाण, तीव्रता, कालावधी हे जर वाढत गेले तर मात्र ते अनेक रोगांना निमंत्रण ठरू शकते.
प्रत्येक दशकात जगभरामध्ये बारा टक्के ‘स्टेस लेव्हल’ वाढतानाचे निष्कर्ष समोर येत आहेत. जीवनाची वाटचाल करत असताना विविध प्रकारचे चढउतार येणे हे नैसर्गिक आहे. आपण सारी माणसे आहोत म्हटल्यानंतर हे सारे असणारच आहे परंतु या वाटचालीमध्ये अनेक टप्प्यांवर उद्भवणारा ताण हाताळण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. कारण ताण-तणाव शरीर आणि मनावर आक्रमण करतात. ताणामुळे आनंद कमी होणे, चिडचिड होणे, उदास वाटणे, पटकन् रागावणे, कार्यक्षमता घटणे, परस्परात अंतर निर्माण होणे, संघर्ष वाढणे, झोप व्यवस्थित न लागणे, सतत आरोग्याच्या कुरबुरी चालू होणे अशा गोष्टी सुरू होतात. या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर ताणाला सामोरे जायला शिकायला हवे.
त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ताण व्यवस्थापनाची’ जबाबदारी आपण स्वतःच घ्यायला हवी. अमुक गोष्टीमुळे, परिस्थितीमुळे, व्यक्तीमुळे ताण उद्भवला असे म्हणत न राहता उद्भवलेल्या ताणाचे व्यवस्थापन माझे मलाच करायचे आहे आणि ती जबाबदारी माझी आहे हे स्वीकारून पुढील दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे अन्यथा ताणाला सामोरे जाणे अवघड होऊन बसेल. स्वतःची प्रतिक्रिया बदलता आली तर तणावाला सामोरे जाणे उत्तम रीतीने जमू लागते आणि ते अत्यावश्यक आहे.
ताणाचे व्यवस्थापन करताना चार आवश्यक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्याला 4 A’s of stress Management असे म्हटले जाते. ते पुढीलप्रमाणे..
1. Avoid-
शक्य असेल तिथे तणावपूर्ण परिस्थिती, ज्यामुळे तणाव निर्माण होतो अशा गोष्टी टाळायच्या.
2. Alter-
ज्या गोष्टीमुळे, परिस्थितीमुळे ताण उद्भवतो असे वाटते ती परिस्थिती हाताळण्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायचा. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर पुढील उदाहरणातून सांगता येईल. उदा. समजा उद्या पाहुणे येणार आहेत आणि कामवाली सुट्टीवर आहे. ऑफिसच्या कामाचीही खूप गडबड आहे. एवढय़ा सगळय़ा गोष्टी एकटीने कशा करायच्या याचा ताण येणे स्वाभाविक आहे. येणाऱया व्यक्तींशी थोडय़ा वेगळय़ा पद्धतीने, शांतपणे योग्य संवाद साधत त्यांना समजावून सांगून त्यांना नंतर येणे शक्य आहे का अशी विचारणा करत चार दिवसानंतरचे नियोजन करता येईल.
Accept-
ज्या गोष्टींमुळे तणाव येतो ती परिस्थिती, माणसे वा अन्य गोष्टी याबाबत वरील दोन गोष्टी करता येत नसतील तर आहेत त्या गोष्टी स्वीकारायच्या. वरचे उदाहरण घेऊनच सांगायचे तर येणाऱया लोकांना टाळणे शक्य नाही, पुढच्या वेळेचे नियोजनही होत नाही. मग काय करता येईल तर.. चिडचिड न करता आपल्याला काय करता येईल, कामांची वर्गवारी कशी करावी लागेल याकडे लक्ष देणे सयुक्तिक होईल. किती जण येणार आहेत, जेवणाचा बेत काय करायचा आहे, त्यात सुटसुटीतपणा आणता येईल का? गुलाबजामसारखा एखादा आधी करता येण्याजोगा पदार्थ त्याचा विचार आणि कृती. भाजी आधी चिरून ठेवणे. ताट वाटय़ा भांडी एकत्र करून ठेवणे, इतर बारीक सारीक गोष्टी आधी करून ठेवल्या तर चालू शकतील. चिडचिड न करता परिस्थितीचा स्वीकार आणि हे करावे लागणार आहे हे लक्षात घेऊन नियोजन केले तर तसे केल्यामुळे तारांबळ उडणार नाही आणि पर्यायाने त्यातून उद्भवणारा ताण कमी होईल.
4. Adapt-
आपण स्वतःकडूनही काही अपेक्षा करत असतो, म्हणजे पहा हं. वरच्या उदाहरणातील पाहुणे यायचे आहेत. ते खूप महत्त्वाचे आहेत. मदतीला इतर कुणी नाहीत. पण स्वागत तर व्यवस्थित करायचे आहे. ऑफिसचीही काही कामे समोर दिसत आहेत. एरवी अगदी विविध पदार्थ करत आपण नेहमी येणाऱयांचे आदरातिथ्य करतो, आपल्याला नावीन्यपूर्ण पदार्थ करता येतात आणि त्याची आवडही आहे परंतु यावेळी आपल्याला काय शक्मय आहे याचा नीट विचार करून मला माझ्याकडूनच असलेल्या अपेक्षांना (मी हे केले पाहिजे, ते करायलाच हवे वगैरे) नाही म्हणता यायला हवे. किंवा दुसऱयालाही योग्य शब्दात नकार देता यायला हवा. स्वतःशी आणि दुसऱयाशीही कौशल्याने संवाद साधता यायला हवा. कोणताही अट्टहास न ठेवता आता जे शक्मय आहे, सुटसुटीत आहे ते करण्याचा प्रयत्न करायला हवा.
मुळातच ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल घडवणे आवश्यक असते हे लक्षात घ्यायला हवे. मला आलेल्या ‘स्टेस’ची जबाबदारी माझी आहे आणि तो कमी करण्यासाठी माझे मलाच प्रयत्न करायचे आहेत हे स्वीकारून वाटचाल व्हायला हवी. सर्वप्रथम आपल्याला कुठच्या गोष्टीचा कितपत ताण जाणवतो ते लक्षात घ्यायला हवे. चालना वा गती देणारा सौम्य प्रमाणातील ताण असेल तर हरकत नाही. ताण मध्यम स्वरुपाचा असेल तर त्यामागच्या कारणांचा शोध घेऊन आपल्या वर्तनात योग्य बदल करायला हवेत. आत्मपरीक्षण करत आपल्या स्वभावातील बोचरे कंगोरे बोथट करायला हवेत. स्वभावातील ताठरपणा, हट्टी, अति अहंकार, समजूतदारपणाचा अभाव, भावनिक नियंत्रण नसणारे लोक जास्त प्रमाणात ताण अनुभवतात. याउलट स्वतःबद्दलची योग्य जाणीव असणारे, वास्तवाचे भान असणारे, लवचिकपणा असलेले, तडजोडीसाठी तयार असणारे, परिस्थिती हाताळताना आपल्या पूर्वानुभवाचा उपयोग करणारे लोक तुलनेने कमी ताण अनुभवताना दिसतात.
वेळेचे, कामांचे नियोजन, आपली बलस्थाने, उणिवा, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक गोष्टी ताणाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात.
मुळातच ताण तणाव वाढू नये यासाठी आपण आपल्या मनात डोकावून पाहतो का हेही पहायला हवे. कारण ताण तणावाकडे वाटचाल होऊ द्यायची नसेल तर आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूक असणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करता येईल हे जाणून घेऊया पुढच्या भागात.
-ऍड. सुमेधा संजीव देसाई