झटपट बदलणाऱ्या जगाला आज सगळ्या गोष्टीपण झटपट हव्या आहेत. आणि अशा झटपट मिळणाऱ्या सुविधा आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला मिळतात. हे जलद उपाय आपले जीवन सुकर नक्कीच करतात. पण त्यांची एक धोकादायक बाजू आहे ज्याबद्दल बोलणे आवश्यक आहे. झटपट किराणासामान हवे आहे? ऑनलाईन अॅपद्वारे मागवा. झटपट मनोरंजन हवे आहे? सोशल मीडिया नाहीतर महाजालाचा (इंटरनेट) वापर करून चित्रपट बघा. वेगवान जीवनशैलीसाठी वेगवान उपाय शोधणे ही काळाची गरज बनली आहे. पण प्रत्येक राजमार्गावर एक पाटी आपण सगळ्यांनी वाचली असेल जी सांगते की ‘अति घाई, संकटात नेई.’ हाच सिद्धांत आपल्या रोजच्या आयुष्यातदेखील लागू पडतो.
सोशल मीडिया आणि झटपट बातम्यांच्या वापराच्या युगात, ‘फेक न्यूज’ या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले आहे. चुकीची माहिती व्यापक बनली आहे, ज्यामुळे समाज आणि लोकशाहीसाठी हानिकारक परिणाम होतात. आज कोणीही सोशल मीडियावर जाऊ शकतो, व्हीडिओ टाकू शकतो आणि लोकांसमोर खरी बातमी म्हणून त्याची जाहिरात करू शकतो. बरेचदा झटपट बातम्या मिळवण्याच्या नादात आणि आंधळ्या विश्वासामुळे आपण या छोट्या बातम्यांच्या मागचा खरेपणा पारखण्यास असमर्थ ठरतो आणि त्यामुळे समाजामध्ये अस्थिरता पसरण्याची भीती असते.
बनावट बातम्या, ज्याची व्याख्या हेतुपुरस्सर खोटी किंवा तथ्यात्मक म्हणून सादर केलेली दिशाभूल करणारी माहिती आहे. त्यांना सोशल मीडिया व्यासपीठ आणि इतर ऑनलाइन माध्यमांवर एक हवे तसे पसरवण्याचा फंडा सापडला आहे. ऑनलाइन माहिती पसरवण्याची सुलभता लाभल्यामुळे चुकीच्या माहितीचा वेग आणि पोहोच वाढला आहे. असत्य बातम्या, अफवा, फेरफार केलेल्या प्रतिमा आणि बनावट कथा त्वरित व्हायरल होऊ शकतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि घबराट निर्माण होते.
बनावट बातम्यांचे परिणाम डिजिटल क्षेत्राच्या पलीकडे पसरतात. चुकीच्या माहितीमध्ये जनमत तयार करण्याची, निवडणुकांवर प्रभाव टाकण्याची आणि हिंसा भडकवण्याची ताकद असते. बनावट बातम्यांचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे पारंपरिक बातम्यांच्या स्रोतांवरील विश्वास कमी होणे. नक्की काय खरे आणि काय खोटे याची शहानिशा करणे अवघड झाले आहे. एका वेळेला एवढी माहिती एवढ्या विविध जागांवर माणसाच्या मेंदूवर पडते, की त्याची निर्णयक्षमता बिघडते. यामुळे माध्यमांवरील बातम्यांवरचा आणि समाजावरचा विश्वास आपल्याला कमी होताना दिसत आहे. समाज आणि इंटरनेटचे जग आज सकारात्मक आणि नकारात्मकमध्ये विभागले गेले आहे. शिवाय, खोट्या बातम्यांमुळे अनेकदा सामाजिक विभागणी वाढण्याची भीती असते. हे लोकांच्या भीती, पूर्वग्रह आणि पक्षपातीपणाचे शोषण करू शकते. ज्यामुळे द्वेषयुक्त भाषण आणि भेदभावपूर्ण वृत्तीचा प्रसार होतो. खोट्या कथनांमुळे उपेक्षित समुदायांना आणखी कलंक लागू शकतो. शत्रुत्व आणि वैमनस्यपूर्ण वातावरणदेखील निर्माण होऊ शकते. जगात होणारे दंगे, भांडण, वादविवाद आणि असहिष्णुता हा सर्व समाजात चुकीच्या माहितीच्या प्रसाराचा परिणाम आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी एक आहे. आणि कोणतीही लोकशाही प्रभावीपणे कार्य करण्यासाठी त्यातील जागरूक नागरिकांवर अवलंबून असते. अशावेळी जर लोकशाही देशात खोट्या आणि बनावट बातम्या झपाट्याने पसरत असतील तर त्या समाजाच्या अखंडतेला धोका निर्माण करतात. फक्त खोट्या बातम्या नाहीत तर कित्येक प्रकारचा खोटा बातम्यांचा समूह आज इंटरनेट द्वारे पसरवला जातो आहे. यामुळे बँक फसवणूक, ऑनलाइन दरोडे आणि इतर गुह्यांची संख्या जगात वाढत आहे. नेटफ्लिक्स या ऑनलाईन माध्यमाने ‘जमतारा’ नावाची एक मालिका लोकांसमोर आणली आहे जी अशा ऑनलाइन सायबर घोटाळे आणि टोळ्यांद्वारे केलेल्या दरोड्यांबद्दल जागरूकता पसरवते. या घोटाळ्यांबद्दल नागरिक म्हणून आपण स्वत:ला शिक्षित करणे अत्यावश्यक झाले आहे.
या प्रभावाचे एक उदाहरण देशाच्या निवडणुकांवर पहायला मिळते. समाजाने कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास कसा ठेवायचा? रोजच त्यांच्याबद्दलच्या वादाच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. सरकार हे लोकांसाठी आहे आणि देशाच्या भल्यासाठी काम करणे ही त्यांची ओळख आहे. परंतु त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, ऑनलाइन जग दररोज नवीन वाद निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे त्यांची कर्तव्ये आणि समाजातील योगदानांचे विश्लेषण करताना आपल्या निर्णयाला खूप पूर्वग्रह निर्माण होऊ शकतात. खोट्या बातम्यांमुळे द्वेष, भेदभाव आणि भीतीदेखील वाढते. हे लोकांच्या पक्षपातीपणाचा फायदा घेऊन मोठ्या संघर्षांना कारणीभूत ठरत आहे. यामुळे समाजातील लोकांचा इंटरनेटवरचा आणि राजकारणावरचा विश्वास उठत चालला
आहे.
खोट्या बातम्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोन समाजात असणे आवश्यक आहे. तांत्रिक माध्यमांनी ही जबाबदारी स्वीकारण्याआधी समाज आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपण या गोष्टीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे आणि बनावट बातम्यांना बळी न पडता, व्यावहारिकदृष्ट्या गोष्टींची शहानिशा केली पाहिजे. या व्यासपीठांवर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांबरोबरच या बातम्यांची शहानिशा करणारे गट आणि लोकदेखील उपलब्ध आहेत. एक समाज म्हणून आपण स्वत:ला आणि इतर व्यक्तींना माहितीच्या स्रोतांचे गंभीरपणे मूल्यांकन करण्यासाठी आणि खोटे प्रचार ओळखण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे.
जशी समाजाला झटपट गोष्टी मिळण्याची आणि झटपट कामे करून घेण्याची आवश्यकता आहे, तसेच जगाला जागरूक होऊन समाजाची काळजी घेणे आणि त्याच्याप्रति आपली जबाबदारी समजण्याचीदेखील नितान्त आवश्यकता आहे. भारताकडे लोकसंख्येची ताकद आहे. योग्यरित्या वापरल्यास, आपण हवे ते यश मिळवू शकतो. पण जर ही लोकसंख्या आणि हा समाज एकमेकांची काळजी घेत नसेल तर आपण आपल्या स्वत:च्या जीवनाचा दर्जा खराब करू. खोट्या बातम्यांचा अनियंत्रित प्रसार समाज आणि लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण धोका आहे. त्याची यंत्रणा आणि परिणाम समजून घेऊन, सर्वांच्या फायद्यासाठी सुरक्षित माहिती परिसंस्था वाढवून, माध्यम साक्षरता, उत्तरदायित्व आणि माहितीपूर्ण सार्वजनिक जागऊकतेला प्रोत्साहन देणारी धोरणे विकसित करण्यासाठी आपण एकत्र काम करू शकतो.
-श्राव्या माधव कुलकर्णी