कोकणात मान्सून सक्रिय झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. परंतु दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. जून महिना अर्धा संपत आला, तरी शेतीची कामे रखडलेलीच आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. खरीप हंगामासाठी पुरेशी खतेही उपलब्ध झालेली नाहीत. दुसरीकडे कोकण किनारपट्टीवर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा प्रभावही दिसून येत असल्याने मान्सून सक्रीय होण्यात अडथळे येत आहेत.
कोकणात दरवर्षी मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस होतो. त्यामुळे बळीराजा मान्सूनची वाट न पाहताच शेतीच्या कामांना सुरुवात करीत असतो. यावर्षी कोकणात 22 व 23 मे या दिवशी अवघ्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाने दडी मारली. कोकणवासीयांचा ‘मिरग’ सुका गेला आणि अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे.
यावर्षी लांबलेला मान्सून कधी दाखल होणार, याची प्रतीक्षा असतानाच 11 जूनला महाराष्ट्रात अर्थात कोकण किनारपट्टीवर मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. परंतु, प्रत्यक्षात अधून-मधून एक-दोन सरी सोडल्या, तर पाऊस झालेलाच नाही. मान्सून वाजत गाजतच दाखल होत असतो. ढगांचा गडगडाट, वादळी पाऊस आणि हवेतील गारवा यातूनच मान्सून दाखल झाल्याचे अनुभवयाला मिळते. परंतु, तूर्त तरी जिल्ह्यात रखरखता उष्माच जाणवत आहे.
भात (तरवा) रोपवाटिका तयार करण्याच्या कामासाठी शेतजमीन चांगली भिजावी लागते. तरच चांगली नांगरणी करून रोपवाटिका तयार करता येतात. परंतु, जमीन भिजण्याइतकाही पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा झाली आहे. शेतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी कृषी खात्याने कोकणात मान्सून पूर्व तयारी केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 40 हजार मेट्रीक टनापर्यंत खताची मागणी आहे. परंतु, त्यातील निम्मेच खत मंजूर झाले आहे. 18 हजार क्विंटलपर्यंत बियाण्यांची मागणी आहे. त्यामधून बियाणे टप्प्या-टप्प्याने उपलब्ध झाले आहे. परंतु, खताची मोठी मागणी असूनसुद्धा खत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले नाही. चार हजार मेट्रीक टनापर्यंत खत उपलब्ध झाले आहे. हे खत पुरेसे ठरणार नाही. कोकणात दमदार पाऊस पडत नसल्याने खताला अद्याप शेतकऱ्यांची मोठी मागणी नाही. परंतु, पाऊस एकदा सक्रिय झाला की शेतीच्या कामांनाही वेग येणार आहे आणि खते व बियाण्यांचीही मागणी वाढणार आहे.
खतांच्या बाबतीत सिंधुदुर्गसाठी जमेची बाजू म्हणजे आजवरच्या इतिहासात प्रथमच अधिकृत रेकने अर्थात रेल्वेने खरीप हंगामासाठी खत उपलब्ध झाले आहे. झाराप येथे उतरविण्यात आलेल्या रेकमधून 1512 मेट्रीक टन सुफला खत उपलब्ध झाले आहे. दरवर्षी दहा ते पंधरा हजार मेट्रीक टनापर्यंत शेतकऱ्यांना खताची आवश्यकता असते. त्यामुळे पहिल्या रेकमधून आलेले खत हे दहा टक्केच आले आहे. मात्र झाराप येथे कायमस्वरुपी खत उतरवून घेण्यासाठी पुढील वर्षापर्यंत नऊ कोटीचे गोदाम बांधणार असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे रेल्वेने खत आणण्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. सिंधुदुर्गात प्रथमच झाराप रेल्वे स्थानक रेक पॉईंटला मालगाडीच्या 23 डब्यांतून सुमारे 1512 मेट्रीक टन खत दाखल झाले, ही समाधानाची बाब आहे. पुढील वर्षी गोदाम उभे राहिल्यास तीन हजार मेट्रीक टनापर्यंत खत उतरविता येणार आहे. सध्या मागणीच्या दहा टक्केच खताचा पुरवठा झाला असला, तरी अजून पाऊस झालेला नाही. त्यामुळे कमी पुरवठा झालेल्या खताचा परिणाम अद्याप जाणवत नसला, तरी पाऊस सक्रिय होऊन शेतीच्या कामांना वेग आल्यावर मात्र खताचा मोठा पुरवठा करावा लागणार आहे.
अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर समुद्राला उधाण आले आहे. मोठमोठ्या लाटा उसळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे समुद्र किनारी बिपरजॉयमुळे लाटांचा मोठा तडाखा बसला. पर्यटक पाण्यात फेकले गेले, सुदैवाने जीवित हानी झाली नाही. पण दुसरीकडे गणपतीपुळे किनारपट्टीवरील 49 व्यावसायिकांचे मोठे नुकसान मात्र झाले. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी गणपतीपुळे किनारपट्टीवर पर्यटकांना जाण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली असून जीवरक्षक तैनात केले गेले आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीच्या दिशेने सरकत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. कोकण किनारपट्टीवर बिपरजॉयचा प्रभाव 14 जूनपासून हळूहळू कमी होणार आहे. सुदैवाने बिपरजॉयच्या प्रभावाने कोकण किनारपट्टीला मोठा धोका पोहोचला नाही. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तानकडे सरकून कोकण किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असल्याने कोकणात मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील दोन-चार दिवसांत दमदार पावसाची शक्यता आहे.
संदीप गावडे