गळीत हंगामाची बारा वर्षाची वाटचाल
कोल्हापूर/संतोष पाटील
राज्याचा ऊस गळीत हंगाम सलग तीन वर्षे वाढत जावून चौथ्या वर्षी सरासरी 30 टक्क्यांनी कमी होत असल्याचे मागील बारा वर्षातील आकडेवरुन स्पष्ट होते. उसाला पोषक असणारे वातावरण आणि चढा भाव हे यामागील एक कारण असल्याचे तज्ञांचे मत आहे. चालू 2022-2023 हंगामात भारताचे साखर उत्पादन एक दशलक्ष टनांनी घसरून 33.5 दशलक्ष टन तर महाराष्ट्राचे 2021-22 हंगामातील 13.7 दशलक्ष टनांच्या तुलनेत चालू हंगामात महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन 11.3 दशलक्ष टन इतके कमी राहण्याचा अंदाज आहे.
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (एआयएसटीए) ने 2022-23 हंगामासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखर उत्पादन 34.5 दशलक्ष टन असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. सुधारित आकडेवारीच्या आधारे, देशातील साखर उत्पादन मात्र 2021-22 च्या हंगामात 35.8 दशलक्ष टनांच्या वास्तविक उत्पादनाच्या तुलनेत 2.3 दशलक्ष टनांनी कमी राहण्याची शक्यता आहे. राज्यात 2011-2012 हंगामात 756 लाख हेक्टर क्षेत्रात ऊस होता. 2012-2013 हंगामात 964 लाख हेक्टर, 2013-2014 हंगामात 937 लाख हेक्टर, 2014-2015 हंगामात एक हजार 54 लाख हेक्टर, 2015-2016 हंगामात 987 लाख हेक्टर, 2016-17 हंगामात 633 लाख हेक्टर, 2017-2018 हंगामात 902 लाख हेक्टर, 2018-2019 हंगामात एक हजार 162 लाख हेक्टर, 2019-2020 हंगामात 822 लाख हेक्टर, 2020-2021 हंगामात एक हजार 142 लाख हेक्टर तर 2021-2022 गळीत हंगामात एक हजार 320 लाख हेक्टरक्षेत्रात शेतकऱ्यांनी उसाचे पिक घेतले आहे. उसक्षेत्रात वाढ झाली असली तरी साखर उत्पादन तुलनेत कमी झाले आहे.
अहवालानुसार 2021-22 हंगामातील 13.7 दशलक्ष टनांच्या तुलनेत चालू हंगामात महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन 11.3 दशलक्ष टन इतके कमी राहण्याचा अंदाज आहे. कर्नाटकातील उत्पादन या कालावधीतील 6.2 दशलक्ष टनांच्या तुलनेत 5.5 दशलक्ष टनांवर थोडेसे घसरण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये, मागील हंगामातील 10.2 दशलक्ष टनांच्या तुलनेत 2022-23 हंगामात 10.8 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन किंचित जास्त असल्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर विभाग उताऱ्यात अव्वल
गत हंगामात राज्यातील 196 साखर कारखान्यांनी 140 दिवसाच्या गळीत हंगामात एक हजार 12 लाख टन उसाचे गाळप केले. सरासरी 10.50 टक्के उतारा मिळवत 106 लाख टन विक्रमी साखर उत्पादीत केली. कोल्हापूर जिह्याने 133 दिवसांच्या गळीत हंगामात 22 कारखान्यांनी 150 लाख टन गाळप, 18 लाख 21 हजार क्विंटल टन साखर सरासरी 12.08 टक्के उताऱ्याने उत्पादीत करत राज्यात या सर्वच बाबींत अव्वल स्थान राखले होते. मागील दहा वर्षातील यंदाचा गळीत हंगाम उस गाळपात विक्रमी ठरला असला तरी साखर उताऱ्यात निच्चांकी होता. यंदाच्या गळीत हंगामात 204 साखर कारखान्यांनी 951.57 लाख क्विंटल साखर उत्पादन केली, त्यापोटी 959.97 लाख टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 9.91 टक्के इतका आहे. कोल्हापूर विभाग साखर उताऱ्यात अव्वल ठरला असून 11.41 टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे.