खानापुरातील राजा टाईल्स-गोवा क्रॉस रस्ताकामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : रस्त्याची दुर्दशा
प्रतिनिधी / खानापूर
राजा टाईल्स ते गोवा क्रॉस रस्त्याच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी आमदारांनाही खोटी आश्वासने दिली आहेत. खानापूर शहरातून राजा टाईल्स ते गोव क्रॉस या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. झालेल्या पहिल्याच पावसात या रस्त्यावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत.
राजा टाईल्स ते गोवा क्रॉस हा रस्ता गेल्या तीन वर्षापासून ख•sमय बनलेला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा आंदोलनेही झाली आहेत. मागीलवर्षी रुमेवाडी क्रॉस येथे म. ए. समितीच्यावतीने रस्त्यावरील ख•dयात आंदोलन करून झाडे लावण्यात आली. त्यावेळी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली होती. आणि हा रस्ता वाहतुकीस योग्य केला होता. मात्र ही डागडुजी तात्पुरती होती. तसेच गेल्या सात-आठ महिन्यापासून पाऊस नसल्याने रस्त्यावरुन वाहतूक होत होती.
आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या रस्त्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक भुवनेश कुमार यांची धारवाड येथे भेट घेऊन तातडीने हा रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यासंदर्भात चर्चा केली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी संतोष होनकांडे उपस्थित होते. रस्ता कोणाच्या अधिकाराखाली? यावरुन जबाबदारी झटकण्यात येत होती. यासाठी आमदारांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात विचारविनिमय केला होता.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी हा रस्ता येत्या पंधरा दिवसात दुरुस्त करू, असे आश्वासन आमदारांना दिले होते. तसेच वन टाईम डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत हा रस्ता पूर्णपणे नव्याने बांधण्याचे नियोजन असल्याचे महामार्ग अधिकाऱ्यांनी सांगितले होते. गेल्या पाच र्षापासून वन टाईम डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत हा रस्ता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गांतर्गत येणारा बेळगाव-गोवा रस्ता खानापूरबाहेरुन सुरू झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याबाबत हात झटकलेले आहे. आणि हा रस्ता सार्वजनिक बांधकामाच्या अखत्यारीत असल्याचे सांगत आहेत. तर सार्वजनिक बांधकाम खाते हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या रस्त्याला वाली कोण? दोन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्ता दुरुस्तीसंदर्भात सूचना करुनदेखील अधिकाऱ्यांनी आमदारांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याने पहिल्याच पावसात रस्त्यावरील वाहतूक बंद होणार आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे. तसेच खानापूर शहरातून होणारी बस वाहतूक बंद होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागणार आहे. येत्या एक-दोन दिवसात रस्त्याबाबत ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. अन्यथा गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेली या रस्त्याची परवड ये रे माझ्या मागल्या होणार आहे.