पुणे / प्रतिनिधी :
येत्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
बारामतीत अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कर्नाटकचे अर्बन डेव्हलपमेंट मंत्री बी. एस. सुरेश, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार आर. व्ही. देशपांडे, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, दिगंबर दुर्गाडे, रमेश थोरात, उत्तमराव जानकर, पुरुषोत्तम जगताप, बाळासाहेब तावरे, प्रमोद काकडे, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, सचिन सातव आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सिद्धरामय्या यांना ‘समाजरत्न पुरस्कारा’ने पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, कर्नाटक निवडणूकीपूर्वी काँग्रेसने महिलांना मोफत बस प्रवासचे आश्वासन दिले होते. त्यांच्यासाठी ‘शक्ती’ योजनेची घोषणा करण्यात आली होती. सरकार स्थापनेनंतर २४ तासांच्या आत कॅबिनेट बैठक घेत हा निर्णय घेण्यात आला. महिला सबलीकरणासाठी आमचे सरकार तेथे प्रयत्नशील आहे. या शिवाय जाहीरनाम्यात कुटुंबप्रमुख महिलेला दरमहा २ हजार रुपये देण्याची आम्ही घोषणा केली होती. ती येत्या १५ ऑगस्टपासून राज्यभर लागू होईल. येत्या निवडणूकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येईल. त्यावेळी कर्नाटकातील या योजना महाराष्ट्रात राबवाव्यात, अशी सूचना मी शरद पवार यांना करत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याचा त्यांनी आढावा घेतला. अहिल्यादेवींनी महिला शिक्षण, सबलीकरणासाठी त्या काळी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. महिला शिकल्या नाहीत, सामर्थ्यवान झाल्या नाहीत तर, समाज पुढे जाणार नाही, हे ओळखून अहिल्यादेवी यांनी महिलांसाठी धोरणे आखले. इंदौरच्या या महाराणीचा महाराष्ट्रासह जगाने गौरव केला आहे.
शरद पवार म्हणाले, राजसत्ता ही समाजासाठी वापरायची असते. जनतेला सन्मानाची वागणूक देण्यासाठी वापरायची असते, हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कृतीतून दाखवून दिले. या महान विभूतीचे स्मरण करत असताना शेजारच्या राज्यातील धनगर समाजातून आलेले मुख्यमंत्री बारामतीत कार्यक्रमाला आले, याचा आनंद आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील जनतेने त्यांना पाठींबा दिला, कर्तृत्वाची नोंद घेतली. त्यांचा आदर्श तुम्ही-आम्ही घ्यावा यासाठी त्यांना आमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, कर्नाटकातील जनतेने नवा इतिहास घडवल्याने देशाचे राजकारण बदलले आहे. बारामतीच्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचे फक्त परिपत्रक या सरकारने काढले. तरीही मोठा तीर मारल्याचा आव आणला जात आहे. नामकरणाचा सर्वाधिक आनंद बारामतीकरांना आहे. आमच्या मनामध्ये कोणतीही खोट नाही, पण हा निर्णय घेताना बारामतीकरांना विचारात घेवून तो होणे अपेक्षित होते. मेडिकल कॉलेजच्या नावात बारामतीचा उल्लेख असावा, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू, असेही ते म्हणाले.
खासदार सुळे म्हणाल्या, सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात कर्नाटकाने बदल घडवला. ते गेमचेंजर आहेत. त्यामुळे आता देशात बदल घडतो आहे. धनगर, मराठा, मुस्लीम, लिंगायत आरक्षणाचे प्रश्न मी संसदेत मांडले. मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे पाठपुरावा केला. परंतु एसटीचे आरक्षण कमी होवू देणार नाही, अशी भूमिका भाजपचे लोक संसदेत मांडतात, त्यांची ही दुटप्पी भूमिका जनतेच्या लक्षात आली आहे. आरक्षणाचा लढा मी पूर्ण ताकदीने लढणार असून, आरक्षण मिळाल्याशिवाय संसदेत स्वस्थ बसणार नाहीत.