प्रतिनिधी /मडगाव
प्रसिद्ध तियात्रिस्ट व कॉमेडियन मॅथ्यूस कोरीया उर्फ सेल्वी यांचे काल सोमवारी गोमेकॉत निधन झाले. त्यांच्या निधनाने गोव्याने एक नावाजलेला कॉमेडियन कलाकार गमावला. त्यांच्या निधनावर तियात्र कलाकार तसेच राजकीय व्यक्तींनी दुखवटा व्यक्त केला आहे.
वेळळी येथील मॅथ्यूस कोरीया हे कॉमेडियन सेल्वी या नावाने सर्वांना परिचित होते. त्यांनी असंख्य तियात्रातून भूमिका साकारल्या होत्या. गेल्या रविवारी मडगावच्या रवींद्र भवनमध्ये ‘8 दिस’ या तियात्रात भूमिका करताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यावेळी त्यांनी आपल्या साथी कलाकारांना त्याची कल्पना दिली. नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
गेल्या सोमवारी त्यांना दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना तातडीने गोमेकॉत दाखल करण्याचा सल्ला दिला. त्या प्रमाणे सेल्वी यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्यांचा मधुमेह आणि हिमोग्लोबिनची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली होती.
गोमेकॉत सेल्वीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांचा मुलगा मायरॉन यांनी दिली होती. त्यांचा मधुमेह परत सामान्य झाला आहे होता. पण त्याच्या रक्तातील प्लेटलेटची संख्या सुधारणे आवश्यक होते. मात्र, त्यात सुधारणा झाली नाही व त्यांनी काल सोमवारी अखेरचा श्वास घेतला.
गोव्याने एक चांगला कलाकार गमावला
कॉमेडिनय सेल्वी हे केवळ गोव्यातच नव्हे तर जिथे जिथे कोकणी भाषिक आहेत. त्या ठिकाणी ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने गोव्याने एक चांगला कलाकार गमावला असल्याची प्रतिक्रीया प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी न भरून येण्यासाखरी असल्याचे म्हटले आहे.
गोवा फॉरवर्डकडून दुखवटा
गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी ही कॉमेडिनय सेल्वी यांच्या निधनावर दुखवटा व्यक्त केला आहे. सेल्वी हे एक उत्तमपैकी तियात्र कलाकार होतेच. शिवाय त्यांनी आपल्या खास शैलीत विनोदी भूमिका करून रसिकांना कलेचा आनंद मिळवून दिला होता. त्यांच्या निधनाने आपल्याला दुःख झाल्याचे म्हटले असून आपण, त्यांच्या कुटूंबियांच्या दुखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.
प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार युरी आलेमाव यांनी तियात्र कलाकार सेल्वी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना गोव्याने एक चांगला कलाकार गमावला असल्याचे म्हटले आहे. सेल्वी हे केवळ तियात्र कलाकारच नव्हे तर त्यांनी अनेक कोकणी चित्रपटातून भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनाने कोकणी चित्रपट सृष्टीची हानी झाल्याचे म्हटले आहे.