तरुण भारत वृत्ताची दखल
प्रतिनिधी /बेळगाव
चिदंबरनगर स्मशानभूमीतील विद्युत दिव्यांची अखेर दुरुस्ती करण्यात आली आहे. मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात रविवारी रात्री अंत्यसंस्कार उरकावे लागले होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. यासंबंधी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. सोमवारी या दिव्यांची दुरुस्ती करण्यात आली.
पंढरपूर-सांगोला रोडवरील काशेगाव फाटय़ानजीक कार उलटून परशुराम संभाजी जवरुचे (वय 50), राजू संभाजी शिंदोळकर (वय 37, दोघेही रा. भांदुर गल्ली, अनगोळ) या दोघा भाविकांचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचे मृतदेह रविवारी रात्री अनगोळला आणण्यात आले. दोन्ही मृतदेहांवर चिदंबरनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी स्मशानातील विद्युत दिवे बंद होते. त्यामुळे अंधारातच विधी उरकाव्या लागल्या. या गैरसोयीमुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार उरकण्यात आले होते. यासंबंधी ‘तरुण भारत’ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधून स्मशानभूमीतील नादुरुस्त विद्युत दिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. सोमवारी दुरुस्ती करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बैलूर व कौशिक पाटील आदी उपस्थित होते. स्मशानभूमीत विद्युत वाहिन्या खराब झाल्या आहेत. त्या बदलण्याची मागणी करण्यात येत आहे.