अडीच लाखांचे नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
अतिवाड येथील शेतवडीत ठेवलेल्या गवत गंजींना आग लागल्याने दोन गवतगंजी जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे आनंद जोतिबा पाटील व महादेव वेंको या शेतकऱयांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजता ही घटना घडली आहे. या घटनेने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱयांसमोर आता चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
अतिवाड-म्हाळेनट्टी रस्त्यावर असलेल्या चाळोबा देवस्थानाजवळ पिंपळ कट्टे शिवारात ही घटना घडली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्याने दोन्ही गवतगंजी जळून खाक झाल्या. यामध्ये आनंद जोतिबा पाटील या शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले असून 10 ते 15 जनावरांना वर्षभर पुरेल इतका साठवून ठेवलेला गवतसाठा बेचिराख झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शिवाय जनावरांना आता खायला काय घालायचे? अशी चिंता नुकसानग्रस्त शेतकऱयांना लागली आहे. ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा पाटील यांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत दोन्ही गवतगंजी पूर्णपणे जळाल्या होत्या.
आतापर्यंत 15 गवतगंजी जळाल्या
अतिवाड गावात यंदा 15 हून अधिक गवतगंजी जळाल्या आहेत. शिवाय गवतगंजी जळण्याच्या घटना सतत वाढत आहेत. त्यामुळे पशुपालन शेतकरी भयभीत झाले आहेत. आधीच वळिवाच्या पावसाने चारा खराब होऊन चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच सातत्याने गवतगंजींना आग लागत असल्यामुळे शेतकरी भितेच्या छायेखाली वावरत आहेत.