पाठपुरावा करूनही खड्डा बुजविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने रहिवासी-वाहनधारकांचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
रामघाट रोडवर लक्ष्मी टेकडी येथे गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. मात्र खोदण्यात आलेला खड्डा बुजविण्यात आला नाही. खड्डा बुजविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. हा धोकादायक खड्डा बुजविण्यात यावा अन्यथा वृक्षारोपण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
रामघाट रोडवर दुभाजकाजवळ जलवाहिनीला गळती लागल्याने पंधरा दिवस पाणी वाया गेले. सातत्याने तक्रारी करून पाठपुरावा केल्यानंतर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. पण दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. खोदलेल्या खड्डय़ात केवळ माती घालून तो बुजविण्यात आला. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्यास रस्ता खचण्याचा संभव असतो. त्यामुळे खड्डय़ातील माती बसल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
जलवाहिनीची दुरुस्ती करून महिना होत आला, पण रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच पावसाचे पाणी साचत असल्याने खड्डय़ाचा अंदाज येत नाही. याठिकाणी दररोज दहा ते पंधरा वाहने अडकून पडत असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्मयात आला आहे. तरीदेखील खड्डा भरण्यात आला नाही. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. नागरिक हैराण झाले असून वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हा खड्डा तातडीने बुजविण्यात यावा अन्यथा खड्डय़ामध्ये वृक्षारोपण करू, असा इशारा देण्यात आला आहे.