जांबोटी-कणकुंबी भागात वनखात्याचे अक्षम्य दुर्लक्ष : वन्यजीव-दुर्मीळ वनस्पतींवर परिणाम
खानापूर : जांबोटी-कणकुंबी भागातील सह्याद्रीच्या रांगांतील डोंगराळ भागातील जंगलात वणवे लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात हजारो एकर जंगल नष्ट होत आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. वन्यप्राणी तसेच वनस्पतीही नष्ट होत आहेत. या वणव्यांकडे वनखात्याने साफ दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी ग्रामस्थांनी आपल्यापरीने आग विझविण्याचा प्रयत्न केला आहे. जंगलातून येणाऱ्या आगीमुळे अनेक शेतात आग लागण्याचे प्रकारही घडले आहेत.
जांबोटी-कणकुंबी भागात सह्याद्रीच्या रांगा पसरलेल्या आहेत. या रांगांतील डोंगरकपारीत या भागात अतिशय घनदाट जंगल आहे. त्यामुळे हा भाग हरितपट्टा म्हणून घोषित केला आहे. पश्चिम घाट योजनेत हे जंगल अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या जंगलात अतिशय दुर्मीळ वनस्पती आहेत. तसेच सरपटणारे प्राणी, पक्षी व इतर जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हे जंगल अतिसमृद्ध आहे. यामुळे याचे संरक्षण होणे गरजेचे आहे. यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. पश्चिम घाट योजनेंतर्गत या जंगलांचे संरक्षण करण्यासाठी कोट्यावधीचा निधी दिला जातो. वनखात्याकडून विविध उपाययोजना करून जंगल संरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून या घनदाट जंगलात वणवा पेटण्याचे प्रकार कायम घडत आहेत. त्यामुळे हजारो एकर जंगल जळून खाक होत आहे. यात जांबोटी, कणकुंबी, चोर्ला, चिगुळे, चिखले, आमटे, चौकी, सडा, मान या जंगलात वणवा पेटण्याचे प्रकार कायम घडत आहेत. स्थानिक ग्रामस्थ आपल्यापरीनेही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भर उन्हात पेटत असलेल्या वणव्यामुळे त्यातच वाऱ्यामुळे ही आग ग्रामस्थांना आटोक्यात आणणे कठीण झाले आहे. याकडे वनखात्याने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने जंगलात आग लागण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. यामुळे दुर्मीळ वनस्पती तसेच नव्याने तयार होत असलेली जंगले, सरपटणारे प्राणी, पक्ष्यांचे घरटे व अंडी, तृणभक्षी जीव यात नष्ट होत आहेत. त्यामुळे निसर्गचक्रावर व प्राण्यांच्या-पक्ष्यांच्या निर्मितीवर परिणाम होत आहे. स्थानिक वनखात्याकडून आग आटोक्यात आणण्यासाठी तुटपुंजे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
वनखाते मात्र हतबल
वणवा लागण्याचे प्रकार गेल्या महिन्याभरापासून सुरू आहेत. याबाबत वनखात्याने गांभीर्याने घेऊन वरिष्ठ पातळीपर्यंत प्रयत्न करणे गरजेचे होते. तसे होताना दिसत नाही. जांबोटी ते कणकुंबी परिसरातील हजारो एकर जंगल गेल्या महिन्याभरापासून पेटत असताना वनखाते मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे. ही आग जाणीवपूर्वक लावण्यात येत आहे का? असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. या भागात कर्नाटक सरकारचा कळसा प्रकल्प राबविण्याचा अट्टाहास कायम आहे. यासाठी ही जंगले पेटवली जात आहेत का, असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरातील ग्रामस्थांना जंगलात प्रवेशास बंदी आहे. तसेच गुरे घेऊन जाण्यासही पूर्णपणे प्रतिबंध लावण्यात आला असल्याने या भागातील गुराखी व ग्रामस्थ जंगलात जाऊ शकत नाहीत. तसेच आगीचे प्रकार रोखण्यासाठी वनखात्याकडून दरवर्षी अग्निरेषा तयार करून जंगलाचे आगीपासून संरक्षण करण्यात येते. तसेच जंगलात आग लावण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र गेल्या महिन्याभरापासून वणव्याच्या घटना घडत असताना वनखात्याने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात या आगीच्या घटना रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच यासाठी उपाययोजनाही आखाव्यात, अशी मागणी होत आहे.
जबाबदारी झटकण्याचा प्रकार
य् ााबाबत बेळगाव जिल्हा वनाधिकारी हर्षा बानू यांना विचारले असता, त्यांनी याबाबत आपण कणकुंबी वनाधिकाऱ्यांना वणव्यासंदर्भात विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, असे सांगितले आहे. असे सांगून जबाबदारी झटकण्यात आली. तर कणकुंबी वनाधिकारी गणेश शेट्टर यांना संपर्क केला असता त्यांनी याबाबत काही माहिती देण्यास नकार दिला.