वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका यापुढे पाच सामन्यांची होणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी जाहीर केले. 1991-92 पासून सुरू झालेल्या या मालिकेत याआधी दोन्ही संघांत चार कसोटी खेळविल्या जात होत्या.
2024-25 मध्ये होणाऱ्या या मालिकेचे पूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ‘1991-92 नंतर पहिल्यांदाच भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाईल. या उन्हाळ्यातील ही मुख्य मालिका ठरणार असून त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल,’ असी सीएने एक्स हँडलवर सांगितले. बीसीसीआय व सीए दोघांनी संयुक्तपणे या घडामोडीची माहिती दिली आहे. ‘कसोटी क्रिकेटचा समृद्ध वारसा जपण्यासाठी बीसीसीआय कटिबद्ध आहोत. आमचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी सहकार्य सुरू असून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत एका सामन्याची वाढ करून ती पाच सामन्यांची करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि ते वाढविण्यासाठी आम्ही संयुक्तपणे प्रयत्न करीत आहोत. कसोटीचा समृद्ध वारसा पुढे चालू ठेवण्यासाठीच आमचे हे प्रयत्न सुरू आहेत,’ असे बीसीसीआय सचिव जय शहा म्हणाले.
या दोन संघांत झालेल्या मागील चार मालिका भारताने जिंकल्या आहेत. त्यात 2018-19 व 2020-21 अशा दोन लागोपाठच्या मालिका विजयांचा समावेश आहे. मात्र पॅट कमिन्स व त्याच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत भारतावर मात करून गेल्या वर्षी जेतेपद पटकावले होते. या वर्षी होणाऱ्या मालिकेतील पहिली कसोटी पर्थवर होणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक अजून निश्चित करण्यात आलेले नाही, पण नोव्हेंबरमध्ये त्याची सुरुवात होणार हे निश्चित आहे.