नैसर्गिक आपत्तीमुळे 178 बळी ः 1934 गावांमध्ये पूरसंकट
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
ईशान्येतील राज्यांसाठी अतिवृष्टी संकटाचे मोठे कारण ठरले आहे. यातही आसामला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 22 लाखाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. राज्याच्या 34 पैकी 27 जिल्हय़ांमधील कमीतकमी 1,934 गावे अद्याप पुराच्या तडाख्यात आहेत. एप्रिलपासून आतापर्यंत पूर आणि भूस्खलनामुळे जीव गमावणाऱयांची एकूण संख्या 174 वर पोहोचली आहे.
काही नद्यांची पातळी कमी झाल्याने स्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. परंतु ब्रह्मपुत्रा, कोपिली, दिसांग आणि ब्रुरहीडीहिंग यासारख्या नद्या अद्याप अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.
जिल्हाधिकाऱयांनी 23 जिल्हय़ांमध्ये 404 मदत शिबिरांची स्थापना केली असून यात 2 लाख 77 हजार लोकांच्या वास्तव्याची सुविधा करण्यात आली आहे. याचबरोबर आणखी 138 दिलासा शिबिरांद्वारे प्रभावित लोकांना मदतसामग्री पुरविण्यात येत आहे.
पुरामुळे 50,714 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. शेकडो घरे, रस्ते, पूल, कालव्यांचे नुकसान झाले आहे. तर लाखांच्या संख्येतील पाळीव प्राण्यांवर संकट ओढवले आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके सातत्याने मदत तसेच बचावकार्यांमध्ये सामील झाली आहेत.
याचदरम्यान आसाममध्ये पूरग्रस्त जिल्हय़ांचा दौरा केल्यावर केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक आणि गृह मंत्रालयाच्या पथकाने राज्य सरकार, सैन्य, वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. केंद्र सरकार स्थितीवर नजर ठेवून असून सर्वप्रकारची मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.