‘कशासाठी पोटासाठी खंडाळय़ाच्या घाटासाठी’ नावाचं गाणं तुम्ही ऐकलं असेल. रेल्वेत बसून जात असताना येणारे विविध आवाज जर लक्षपूर्वक ऐकत असाल तर ती गाडी जाताना ज्या ठेक्मयात आणि ज्या लयीत पुढे जाते तो आवाज ‘कशासाठी पोटासाठी खंडाळय़ाच्या घाटासाठी’ अशासारखाच येतो असं वाटेल. आधी विलंबित मग मध्य आणि बराच वेळ द्रुतगतीने ती चाललेली असते. पुलंचा याच शीर्षकाचा एक अप्रतिम ललित कम वैचारिक लेख उपलब्ध आहे. त्यात त्यांनी कसं जगावं आणि का जगावं या दोन संकल्पनांचा अतिशय सुंदर भाषेत ऊहापोह केला आहे. जगावं तर प्रत्येकालाच लागतं. त्यासाठी सतत अन्न मिळवावं लागतं. त्यासाठी मग रोजची धावपळ आलीच. रेल्वेत बसून (खरं तर उभं राहून) रोज पोटासाठी कोटय़वधी लोक प्रवास करतात. पण का जगायचं हे उमगलेले लोक त्यातल्या त्यात खंडाळय़ाच्या घाटाची शोभा बघायला विसरत नाहीत. फारच हौशी असतील तर वेळात वेळ काढून फक्त घाटातील वनशोभा पहायला म्हणून मुद्दाम प्रवास करायचं ठरवतात. आणि सर्वात ग्रेट माणसं तर ती असतात की जी कशासाठी पोटासाठीच्या रामरगाडय़ात अखंड धावणाऱया माणसांना खंडाळय़ाच्या घाटाकडेही नजर टाकण्यासाठी उद्युक्त करतात. आनंद हा वाटल्याने वाढतो म्हणतात. त्याचप्रमाणे आपण जर एखाद्या गोष्टीचा आनंद घेत असू तर दुसऱयालाही त्या आनंदात सहभागी करून घ्यावं असं वाटतं. ते माणुसकी जिवंत असल्याचं लक्षण आहे. कित्येकदा वाटेतली एखादी गंमत बघायला हा थांबला म्हणून तो थांबला असं होऊन बऱयाच जणांना ती गंमत पहायला मिळते. कित्येकदा आधी जाणारा मागच्याला कल्पना देऊन ठेवतो. यावरून एक आठवलं. हल्ली बऱयाच गोष्टींवर रिव्ह्यूज लिहिणाऱयांचं प्रमाण भरपूर वाढत आहे. त्यामुळे अनेकांना माहित नसलेल्या गोष्टी, ठिकाणं, हॉटेल्स, डिशेस माहीत होतात. गाण्याच्या, नाटकांच्या बाबतीतही असंच आहे. सोशल मीडियामुळे व्यासपीठ कायम उपलब्ध असतं. तिथे पोस्ट केलं की त्यावर परीक्षणं, रसग्रहण येत राहतं. पूर्वी हे सगळं पेपरपुरतं किंवा प्रकट मुलाखतींपुरतं मर्यादित होतं. आता त्याचं स्वरूप पार बदललं आहे. विकिपीडिया सारख्या साईट्स तर तुम्हाला माहिती अपडेट करण्याची सुवर्णसंधी बसल्याजागी देत असतात. हे सगळं करून बिग डेटात भर घालण्याची आपली हौस आपण पुरी करून घेत असतो. पण एवढं सगळं आपण का आणि कशासाठी करतो हा प्रश्न विचारा स्वतःला. तर प्रत्येक जिवाला निसर्गाने एक वरदान दिलेलं आहे. ते म्हणजे येणाऱया पुढच्या पिढीला अगोदरची माहिती पुरवण्याची सोय करणं. त्यांच्या जाणिवा जागृत ठेवणं, आपत्कालीन परिस्थितीत समजा आपण कुणीच अस्तित्वात नसलो तर आपण कसे जगत होतो, ते जगणं कसं श्रीमंत करीत होतो. यांच्या पाउलखुणा मागे ठेवण्याची प्रत्येकाची सतत धडपड असते.
पण ज्ञानदान करणारे महान लोक, ज्यांनी हजारो वर्षांची मौखिक परंपरा जिवंत ठेवली, वेद, प्राचीन वाङमय आणि मुख्य म्हणजे कलेचे सर्व प्रकार जिवंत ठेवले त्यांनी खरं तर रोजच्या जगण्याला ‘जीवन’ करण्यासाठी सर्वात मोठं योगदान दिलेलं आहे. या पृथ्वीतलावर सौंदर्यतत्त्व जर कुठे शिल्लक असेल तर ते या लोकांनी मागे ठेवलेल्या विविध कलाप्रकारात. वेदातील ऋचा कशाप्रकारे पठण करायच्या हे ठरलेलं असतं. म्हणजे विशिष्ट स्वरातच त्या गाव्या लागतात. म्हणजे संगीतकला इतकी जुनी आहे! खरं तर मूळ स्वर हे ओमध्वनिरूप असून ते साक्षात शिवशंकरांनी निर्माण केले असं म्हणतात. त्याचप्रमाणे लय ही पार्वती मातेने निर्माण केली असं म्हणतात. मग त्या पार्वतीपरमेश्वराला आपणच याचा आनंद घेऊन गप्प बसावं असं का वाटलं नसेल? कारण एकच. लेकरांच्या कंठी हे स्वर बांधावेत आणि त्यांच्या पायी लयीचे घुंगरू बांधून त्यांना आनंदाने नाचायला लावावं ही ती आदिम इच्छा! विद्यादान करण्याचा एक प्राचीन आणि चिरंतन नियम असा की आपण घेतलेल्या ज्ञानाचं योग्य तो शिष्य शोधून हस्तांतरण झालंच पाहिजे नाहीतर ते ज्ञान लाभत नाही. याचाच अर्थ जर
जे जे काही आपणासी ठावे
ते ते इतरांसी सांगावे
शहाणे करून सोडावे सकळ जन
ही रामदास स्वामींची उक्ती ही खरं तर पुनरुक्ती आहे. पूर्वीच्या काळी हा दंडकच होता. त्यामुळे मोठमोठे बुजुर्ग कलाकार योग्य ती परीक्षा घेऊन आपली कला भरपूर शिष्यांना देत असत. अतीव बुद्धिमान कलाकार तर आपल्या गायकीची, वादनाची वैशिष्टय़े समोरच्या माणसाचा वकूब पाहून तसतशी हस्तांतरित करत असत. म्हणूनच कलेची विविध घराणी निर्माण झाली. आजचे त्या त्या घराण्याचं गाणं किंवा वादन शिकणारे कलाकार आपापल्या घराण्याचं नांव आवर्जून लावतात. अत्यंत आदराने आणि प्रेमानं त्याची वैशिष्टय़े जतन करतात. मैफिलीत ती आदरेखून उलगडून दाखवतात. आणि योग्य त्या पुढच्या माणसाकडे हस्तांतरित करतात. हरिवल्लभ संगीत संमेलन, तानसेन संगीत समारोह, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, रत्नागिरीतील थिबा महोत्सव, कोलकात्यात होणारा संगीत महोत्सव आणि असे असंख्य कलौत्सव यासाठीच असतात; की ही कला सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोहोचावी, त्यांचा कान, डोळे तयार व्हावेत. कला म्हणजे काय? त्याचा आविष्कार कसा असतो? त्यातून आनंद कसा मिळू शकतो हे त्यांनी अनुभवावं. यातूनच पुढच्या पिढीचे रसिक तयार होतात. कलाकारही घडतात. एरवी प्रचंड किमतीची तिकिटं काढून कार्यक्रम पाहणं अनेकजणांना परवडत नसल्याने या निमित्ताने त्यांनाही हे अनुभवता येतं. सच्चा कलाकार हा हेही आपलं कर्तव्य आहे असं समजून आडगावातल्या श्रोत्यांना गाणं ऐकायला मिळावं, संगीत म्हणजे काय हे त्यांना कळावं, तिथल्या चळवळींना प्रोत्साहन द्यावं यासाठी झटत असतो. मला जी वाट अवघड गेली ती मी इतरांसाठी सवघड करीन असं म्हणणं म्हणजेच ऋषींचा वसा. तो एकदा घेतला की टाकायचा नसतो.
पं. अभिषेकी बुवांच्या अनेक शिष्यांपैकी असणारे पं. समीर दुबळे यांच्या मुलाखतीत एक अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट ऐकायला मिळाली. बुवा अगदी आडगावात जाऊनही कार्यक्रम करीत, शक्मय असेल तितक्मया ठिकाणी नवीन संगीत चळवळ उभी करायला प्रोत्साहन देत, तिथे स्वतः निरपेक्षपणे सादरीकरण करीत. प्रसंगी व्यावसायिक दृष्टीने चांगली असलेली एखादी संधी बाजूला ठेवूनही ही खटपट ते शेवटपर्यंत निरलसपणे करीत राहिले. ते असं का बरं करतात याविषयी विचारणा झाल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर, त्याचा आशय हे विचार करायला लावणारे आहेत. त्यांच्या म्हणण्याचा सारांश असा की गावाखेडय़ात लांब राहणाऱया लोकांना संगीताचा कान निर्माण करणं ही आपली कलाकारांची जबाबदारी आहे. नुसता शहरी निमशहरी श्रोतृगण निर्माण करणं नव्हे. आपली कला ही फक्त आपली नव्हे. आपलं गाणं हेही फक्त आपलं नव्हेच. ते ऐकणाऱयाचं धन आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते पुढच्या पिढीचंही धन आहे. आणि हेच धन आपणही मागच्या पिढीकडून घेऊन मोठे झालो. ते ऋण आपण फेडले पाहिजेत. गावोगावी सूर पेरले गेले पाहिजेत. तरच तिथले तानपुरे सतत झंकारत राहतील. लोकांना गाण्यासाठी, गाणं ऐकण्यासाठी एकत्र यावंसं वाटेल. कलाकाराला दाद मिळेल. रसिक श्रोते आणि पुढच्या पिढीचे नवीन तरुण कलाकार घडत राहतील.
धन्य ते कलाकार ज्यांनी हे समाजऋण मानलं आहे! कसं जगावं पासून का जगावंचा प्रवास सोपा करणारे हे लोक असाच सुगंध पसरवीत असतात. त्यांच्यामते कशासाठीचं उत्तर असतं श्रोत्यांसाठी. घेणाऱया हरेकासाठी….
-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभू