मराठा समाजाला आरक्षण देऊ अस सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जरांगे- पाटील यांना उपोषण मागे घ्यायला लावून 40 दिवसांची मुदत मागितली होती. काल दसऱ्याच्या सिमोल्लंघन दिवशी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली असून सरकारने या 40 दिवसात काहीच हालचाल केली नाही असा आरोप करून आज मनोज जरांगे पाटील यांनी आज पासून आपले उपोषणाचे हत्यार पुन्हा उपसले आहे. त्यानंतर आज राज्यसभेचे माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी जालना येथिल त्यांच्या उपोषण स्थळी भेट दिली. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी वाटल्यानेच आलो आहे असे सांगून त्यांनी आज पहील्या दिवशी मनोज जरांगे यांनी पाणी पिण्याची विनंती केली.
जालन्यातील उपोषण स्थळावरून बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “मनोज जरांगे- पाटील परत एकदा बेमुदत उपोषण करत आहे. त्यासाठी मी त्यांना भेटायला आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो आहे. आरक्षणासाठी त्याची धडपड मला दिसत आहे. आपल्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून तो हे सगळं करत आहे.” असे उद्गार संभाजीराजे यांनी काढले आहेत.
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, “मी मनोजला अनेक वर्षांपासून बेमुदत उपोषण करताना बघत असून बऱ्याच वेळा उपोषणामुळे त्याला किडनीचा त्रास झाला असून त्याला चालताही येत नव्हतं. उपोषणानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये लोकांचा हात धरून, काठी घेऊन चालताना त्याला मी पाहीले आहे. आजच्या काळात समाजासाठी एवढं कोण करतं? त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा वंशज म्हणून मनोज जरांगे यांना बळ देण्याची आमची जबाबदारी असून माझं कर्तव्य समजून इथे आलो आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
शेवटी बोलताना संभाजीराजे म्हणाले, “जो समाजासाठी अडचणीत असताना लढतो, त्याला ताकद देऊन पाठबळ देण्याचं काम छत्रपती घराण्याचं आहे. समाजाला न्याय देण्यासाठीच मनोज परत उपोषणाला बसला आहे. मनोजने जलत्याग केल्यामुळे मला काहीच बोलता येत नाही. पण, त्याने किमान पाणी तरी प्यावं ही माझी विनंती असून छत्रपतींच्या नात्याने मला थोडासा अधिकार आहे. मनोजने हे उपोषण करावं. परंतु, किमान पाणी तरी प्यावं, असं मला वाटतं. त्यामुळे मी त्याच्याकडे पाणी पिण्याची विनंती करतो. मनोजच्या या आंदोनाला माझा पाठिंबा आहे. परंतु, त्याने जलत्याग आंदोलन करू नये.” असे भावनिक आवाहन संभाजीराजे यांनी केले.