किनारपट्टीवरील मच्छीमार निसर्गाच्या कचाटय़ात, -हंगामाची सुरूवात लांबणीवर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
पावसाळय़ातील जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या सागरी मासेमारीनंतर 1 ऑगस्ट रोजी यांत्रिक मासेमारी नौकांना समुद्रात मासेमारी खुली झाली. पण खराब वातावरणामुळे हंगामाच्या शुभारंभाला ब्रेक लागला आहे. आज नारळी पौर्णिमा असल्याने या दिवशी समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून नव्या मासेमारीचा मच्छीमार मुहूर्त साधणार का, याकडे नजर लागली आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश 2021 अन्वये 1 जून ते 31 जुलै 2022 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांनी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती. ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू करण्यात आली होती. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाऱया बिगर यांत्रिकी नौकांना लागू नव्हती. ही शासनस्तरावरून घालण्यात आलेली मासेमारी बंदी उठल्यानंतर 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला प्रारंभ झाला. पण खराब वातावरणामुळे हंगामाची सुरूवातच थांबली.
हजारो मासेमारी नौका किनाऱयावरच विसावल्या
वातावरण वादळी असल्यामुळे जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील हजारो मासेमारी नौका बंदरात किनाऱयावरच विसावल्या आहेत. समुद्रात उधाणामुळे कुणीही मच्छीमार धोका पत्कारायला तयार नाहीत. पण आज नारळी पौर्णिमेचा सण साजरा होणार आहे. या दिवशी खवळलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून अनेक मच्छीमार मासेमारीला खऱया अर्थाने प्रारंभ करत असतात. पण हा देखील मासेमारीचा मुहूर्त सध्याच्या खराब वातावरणामुळे हुकणार असल्याचे मच्छीमारांतून सांगण्यात आले.