गांधीनगरचा सरपंच भाजपाचाच
उचगाव /प्रतिनिधी
इतक्या वर्षाचा गांधीनगरचा पाणी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न मागील सत्ताधार्यांनी का मार्गी लावला नाही असा सवाल भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ (Chitra Wagh) यांनी उपस्थित केला. व्यापारी महिला व सर्व सामान्यांचे हित भाजपा सरकारने जपले असुन लोकनियुक्त सरपंच व पॅनेलचे उमेदवार विजयी करा असे आवाहन ही चित्रा वाघ यांनी केले. त्या गांधीनगर येथील सिंधी सेंट्रल पंचायतीच्या हॉलमध्ये भाजपा आणि भारतीय सिंधू सभा पुरस्कृत गांधीनगर एकता मंचच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवार प्रचार सभेत बोलत होत्या. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
चित्राताई वाघ म्हणाल्या, गांधीनगर ही व्यापारी पेठ आहे. येथील स्थानिक व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना मूलभूत सुविधा, तसेच त्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मागील सत्ताधाऱ्यांवर होती. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. महिलांसाठी शौचालय नाही. ही खेदजनक बाब आहे. यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार आहे. गांधीनगरच्या विकासासाठी केंद्रातील आणि राज्यातील सरकार कमी पडणार नाही असे आश्वासन यावेळी वाघ यांनी दिले.
शौमिका महाडिक म्हणाल्या गांधीनगरचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या भविष्यकाळात ग्रामपंचायतची सत्ता भाजपा पुरस्कृत एकता मंचला दिल्यानं विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे मतदारांनी आमिषाला बळी न पडता विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या भाजपा आणि भारतीय सिंधू सभा पुरस्कृत एकता मंचला सत्तेत आणून गांधीनगरच्या सर्वांगीण विकासाला चालना द्या असे आवाहन केले.
यावेळी गांधीनगरच्या सभेदरम्यान भविष्यात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक यांना निवडून देऊन आपले प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी सज्ज राहा असे चित्राताई वाघ यांनी आवाहन केले. यावेळी सरपंच पदाचे उमेदवार संदीप पाटोळे, माजी सरपंच रितू लालवानी, पुनम परमानंदानी, सरिता कटेजा, सचिन जोशी, व सर्व उमेदवार महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.