भरलेली कचऱ्याची वाहनेदेखील केली रिकामी, शहर-उपनगरांमध्ये अस्वच्छता : आंदोलनात हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही सहभाग, सरकारने तोडगा काढणे आवश्यक
बेळगाव : सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनीदेखील आंदोलनात सहभाग घेवून स्वच्छतेचे काम बंद ठेवले आहे. पण हंगामी स्वच्छता कामगारांनी आपले कामकाज सुरू ठेवले असता, काम करण्यास आक्षेप घेवून कामबंद करण्याची सूचना स्वच्छता कामगार संघटनेने केली. त्यामुळे कचऱ्याने भरलेली वाहने रिकामी करून आंदोलनात सहभाग दर्शवला. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे, हंगामी कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे, तसेच विविध मागण्यांसाठी सरकारी नोकर संघटनेने राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. बुधवारी कामबंद आंदोलन छेडून सरकारकडे पाठपुरावा केला आहे. या आंदोलनात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह कायमस्वऊपी स्वच्छता कामगारांनीदेखील सहभाग घेतला आहे. त्यामुळे विविध भागातील स्वच्छतेचे काम ठप्प झाले आहे. स्वच्छता कामगारांच्या सहभागामुळे कचऱ्यांची उचल करण्यात आली नाही. घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यात आला नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा साचला आहे. मात्र या आंदोलनात हंगामी स्वच्छता कामगारांनी सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे हंगामी कामगारांना स्वच्छतेचे काम करण्यास महापालिका नोकरसंघटनेने आक्षेप घेतला. व कामबंद करण्याची सूचना केली. परिणामी हंगामी स्वच्छता कामगारांनीदेखील कामकाज बंद ठेवले. शहरातील कचऱ्याची उचल सकाळच्या दरम्यान ठेवण्यात आली होती. पण स्वच्छतेचे काम करण्यास आक्षेप घेण्यात आल्यानंतर कामकाज बंद करून कचऱ्यांनी भरलेली वाहने ठिकठिकाणी रिकामी केली.
नागरिकांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना
शहरातील कचऱ्याची उचल थांबविल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले होते. विशेषत: बाजारपेठ परिसरात कचरा साचल्याने शहरात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला. उपनगरातही कचऱ्याचे ढिगारे साचल्याने नागरिकांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. स्वच्छता कामगारांनादेखील आंदोलनात सहभागी होण्याची सूचना केल्यानंतर कचऱ्याने भरलेली वाहने रिकामी गेली. अशाप्रकारे बाजारपेठेतील कचऱ्याची उचल ठप्प झाली आहे. मनपाच्या सर्व कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने नागरिकांची कामे रखडली आहेत. कचऱ्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढणार असून सरकारला याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.