’आप’ चे आमदार व्हेंजी व्हिएगश यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / पणजी
दिल्ली, गोवा, पंजाब आणि आता गुजरात या चार राज्यांमध्ये स्वत:चे अस्तित्व सिद्ध केल्यानंतर आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. आप साठी हा ऐतिहासिक क्षण आहे, असे प्रतिपादन आमदार व्हेन्जी व्हिएगश यांनी केले. दिल्ली आता पूर्णत: ’भाजप आणि काँग्रेसमुक्त’ बनली आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर पलटवार केला. पक्षाला हा दर्जा प्राप्त करून देण्यात योगदान दिलेल्या चारही राज्यातील लोकांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
गुऊवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, वाल्मिकी नाईक, सुरेल तिळवे आणि इतरांची उपस्थिती होती. आम आदमी पक्षाने शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात आणलेले आमुलाग्र बदल तसेच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यामुळे लोक या पक्षाकडे आकर्षित होत असून पक्ष स्थापन झाल्याच्या केवळ 10 वर्षातच त्याला राष्ट्रीय दर्जा मिळतो यातच पक्षाचे यश दिसून येत आहे, असे व्हिएगश म्हणाले. दिल्लीत तर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत घवघवित यश संपादन करून भाजपची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
पक्षाची दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता असून गोवा विधानसभा निवडणुकीत लक्षणिय यश प्राप्त करताना पहिल्याच प्रयत्नात दोन उमेदवार विधानसभेत पाठविले होते. आता गुजरातमध्ये सहा उमेदवार विजयी झाले असून 12 टक्के एवढी मते प्राप्त केली आहेत, अशी माहिती श्री पालेकर यांनी दिली. रोजगार, विकास, जलस्रोतांचे पुनऊज्जीव यासारखी कामे प्राधान्याने हाती घेतल्यामुळे पक्षाला लोकांची पसंती मिळत आहे. सध्या आम्ही चार राज्यात अस्तित्व सिद्ध केले असून भविष्यात अन्य राज्यातही लोकांच्या पसंतीस उतरणार आहोत, असे पालेकर म्हणाले. वाल्मिकी नाईक यांनीही विचार मांडले.