राजकीय पक्षांना साकडे
बेळगाव ; बेळगाव उत्तर व दक्षिण मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या अधिक आहे. राष्ट्रीय पक्षांनी लिंगायत समाजाला उमेदवारी दिल्यास त्यांना लिंगायत संघटनांचा पाठिंबा राहणार आहे. सोमवारी येथील नागनूर रुद्राक्षीमठात झालेल्या समाजबांधवांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव उत्तर व दक्षिण या दोन्ही मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या अधिक आहे. तरीही प्रमुख राजकीय पक्ष असणाऱ्या काँग्रेस व भाजपने आजवर लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी दिली नाही. तरीही राजकीय पक्ष देतील त्या उमेदवाराला पाठिंबा देत आलो आहोत. या निवडणुकीत लिंगायतांना उमेदवारी दिल्यास त्यांना विजयी करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या जिल्हा अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी, राष्ट्रीय बसव दलाचे अशोक भेंडीगेरी, लिंगायत क्षेमाभिवृद्धी संघटनेचे एस. जी. सिद्धनाळ, लिंगायत सेवा समितीचे डॉ. के. एन. दोडमनी, लिंगायत नेते सुजित मुळगुंद आदींसह वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकारी व समाज प्रमुखांनी या बैठकीत भाग घेतला होता. या बैठकीत सात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लिंगायतांना उमेदवारी देण्याची मागणी केली. तसा संदेश राजकीय पक्षांना देण्यात आला असून समाजाच्या उमेदवारांना प्राधान्य दिले नाही तर पुढील बैठकीत चर्चा करून राजकीय निर्णय जाहीर करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.