पाण्याच्या टँकरखाली सापडून ठार : गायमुखाजवळ घडली दुर्घटना
कोल्हापूर : बेळगांवहून जोतिबा दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा पाण्याच्या टँकरखाली सापडून दुर्देवी मृत्यू झाला. गणेश सुभाष दुराई (वय 22 रा. शिवाजीनगर, बेळगांव) असे मृताचे नाव आहे. सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास केर्ली जोतिबा मार्गावर गायमुखनजीक ही घटना घडली. याबाबतची माहिती अशी, शिवाजीनगर येथील 8 ते 10 तरुण चैत्र यात्रेनिमित्त जोतिबा देवदर्शनासाठी रविवारी रात्री कोल्हापूरात आले होते. सोमवारी सकाळी गायमुख येथील पार्किंगमध्ये छोटा हत्ती टेम्पो पार्क करुन ते देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर यातील गणेश वा त्याचा सख्खा भाऊ निखील हे अन्य काही मित्रांसमवेत डोंगरावर फिरण्यासाठी गेले होते. जेवणासाठी हे सर्वजण चालत परतत होते. यावेळी गणेशने रस्त्यावरुन जाणाऱ्या एका पाण्याच्या टँकरला हात केला. टँकरवर बसण्याच्या नादात गणेशचा तोल जावून तो टँकरच्या चाकाखाली पडला. चाक त्याच्या अंगावरुन गेल्याने गणेश गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच गणेशचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी याची माहिती त्याच्या मित्रांना दिली. गणेशचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच मित्रांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद सीपीआर रुग्णालयात झाली.
भावाने फोडला टाहो
आपल्या डोळ्यादेखत सख्या भावाचा अपघात झाल्याने निखीलला मोठा धक्का बसला. गणेशवर उपचार सुरु असल्याचे त्याच्या मित्रांनी निखीलला सांगितले. मात्र काही वेळानंतर त्याला गणेशचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी निखीलला मोठा धक्का बसला. माझा भाऊ गेला, आता मी काय करु असा त्याने टाहो फोडला. गणेशने नुकतेच शिक्षण पूर्ण केले होते. त्याचे वडील कपड्याच्या दुकानात कामास आहेत, तर गणेशही वडिलांना हातभार लावण्यासाठी कपड्याच्या दुकानात कामास जात होता. लहान भाऊ निखील हा एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतो.