वृत्तसंस्था/ मुंबई
दिवाळखोरीच्या आरोपाखाली गो फर्स्टची विमान सेवा ठप्प झाली असून याचा फायदा इतर हवाई कंपन्यांनी आपल्या विमान फेऱ्या वाढवून उचलण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे. गो फर्स्टची सेवा खंडीत झाल्यानंतर भारतातील इतर हवाई कंपन्यांनी आपल्या विमानांच्या फेऱ्या तसेच संख्या वाढवण्यावर भर दिला आहे.महत्त्वाच्या वर्दळ असणाऱ्या दोन शहरांमध्ये विमानसेवा देण्यासाठी इतर विविध कंपन्या झटत असल्याचे सांगितले जात आहे. इंडिगोने मुंबईहून दोन शहरांना विमान सेवा सुरु केलीय तर विस्ताराने दिल्लीहून मुंबई अशी सेवा सुरु केलीय.
मुदत वाढवल्याने पेच
गो फर्स्टने विमान रद्दची मुदत 23 मे पर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत 12 मेपर्यंतच होती. त्यासंबंधी कंपनीने निवेदन देत झालेल्या गैरसोयीबद्दल ग्राहकांची माफी मागितली असल्याचे समजते. ही संधी साधून आता इतर स्पर्धक कंपन्यांनी संबंधीत मार्गावर नव्या विमानफेऱ्या सुरु तसेच वाढवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील कंपनीकडून गो फर्स्टला इंजिनचा पुरवठा वेळेवर उपलब्ध होऊ न शकल्याने समस्या निर्माण झाली आहे.
असा होतोय परिणाम
लोकप्रिय पर्यटनस्थळांच्या शहरातून कंपनीच्या विमान सेवा अधिक आहेत. गोवा, लेह व श्रीनगर यांचा त्यात समावेश होतो. दिल्ली ते श्रीनगर मार्गावर 199, दिल्ली ते लेह मार्गावर 182 आणि मुंबई ते गोवा मार्गावर जवळपास 156 विमाने या उन्हाळी हंगामात उडणार होती. ही सेवा सध्या खंडीत झाली आहे. याच संधीचा फायदा इतर भारतीय हवाई कंपन्या उठवत आहेत. आर्थिक दिवाळखोरीखातर कंपनी अडचणीत आली आहे. भारतातील वाडिया समूहाकडे या कंपनीची मालकी आहे.