अध्याय तिसावा
भगवंत म्हणाले, दारूका तू सज्ञान आहेस शिवाय तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच अंतकाळी तुला येथे ठेवून तुझ्याकडून द्वारकेतील लोकांचे प्राण वाचवावेत असे मी ठरवले आहे. त्याप्रमाणे तू त्वरित द्वारकेत जा. तेथील लोकांना इथला वृत्तांत सविस्तर सांगून झाल्यावर त्यांना द्वारका सोडून बाहेर जायला सांग. हे सगळं करायचं कारण म्हणजे द्वारका नगरी वसवण्यासाठी मी समुद्राकडे जागा मागितली होती. आता मीच तेथे नाही हे लक्षात आल्यावर समुद्र नक्कीच ती बुडवून टाकेल. म्हणून उशीर न करता तू लगेचच निघ. वेळ फार थोडा आहे. समुद्र उसळी मारून पुढे यायच्या आत आपला सर्व समुदाय त्यांच्या सर्व सामानसुमानासह तेथून सुरक्षित स्थळी हलव. सर्वांनी एकजुटीने रहा. सगळ्यांनी अर्जुनाचे नेतृत्व मान्य करा. तो सांगेल ते ऐका आणि त्याच्याबरोबर ताबडतोब इंद्रप्रस्थाकडे प्रयाण करा. इंद्रप्रस्थाच्या वाटेवर असताना तोच सर्वांचे रक्षण करेल. श्रीकृष्णांना त्यांच्या प्रयाणानंतर निरपराध प्रजाजनांना वाऱ्यावर सोडायचे नव्हते. त्यामुळे दारूकामार्फत सर्व व्यवस्था कशी करावी हा निरोप त्यांनी पाठवला. श्रीकृष्णाचे वचन ऐकून दारूकाला रडू आले.
आपले प्राणच कुणीतरी काढून घेत आहे असे त्याला वाटले. पाण्यातील मासा बाहेर काढल्यावर जसा तडफडू लागतो त्याप्रमाणे त्याची अवस्था झाली. त्याचा जीव कासावीस झाला. निजकुळाचा घात करून श्रीकृष्णनाथ निजधामाला गेला हे वृत्त मी कोणत्या काळ्या तोंडाने जाऊन द्वारकेतील लोकांना सांगू? जणू काही मीच त्यांचे श्रीकृष्ण दर्शनाचे निजसुख हिरावून घेतले आहे अशा समजुतीने ते मला काळतोंड्या म्हणतील. सगळ्या जगाला दु:खद बातमी देणारा अशी माझी ख्याती होईल. सर्वजण माझी निर्भत्सना करतील. माझा निरोप ऐकून कित्येकांना त्यांचा प्राणांत झालाय असेच वाटेल. लोकांना एव्हढे महादु:ख देण्यासाठी हृषीकेशी मी तेथे जायला तयार नाही. ज्याला ज्याला मी हे वृत्त सांगेन त्याच्या जीवाचा मी घात केल्यासारखे होईल. किती ही निष्ठुरता! श्रीकृष्णनाथा मी एव्हढा निष्ठुर होऊ शकत नाही. मुंग्यांच्या मोठ्याच्या मोठ्या वारुळाला आग लावल्यावर जो हाहाकार उडेल त्याप्रमाणे ही दु:खद वार्ता द्वारकेतील सुहृदांना व समस्त प्रजाजनांना मी सांगितल्यावर तिथे एकच हाहाकार उडेल. फळाफुलांनी बहरलेल्या बागेला दावाग्नी लावल्यावर जी परिस्थिती ओढवेल त्याप्रमाणे तुमच्या निधनाची वार्ता द्वारकेत कळली की तेथे एकच भडका उडेल? ते काम मी कशाला करू? बुडणाऱ्याच्या डोक्यावर पाषाण ठेवल्याप्रमाणे कृष्णासहित सर्व कुळाचा नाश झाला ही बातमी द्वारकेतील लोकांच्यावर आघात करेल. कृष्णा माझ्याच्याने कोणत्याही परिस्थितीत ही वार्ता द्वारकेत जाऊन सांगण्याचे धाडस होत नाही. आपल्या नातेवाईकांना सुखदायक, आनंद देणाऱ्या वार्ता सांगाव्यात पण ते तर बाजूलाच राह्यले, त्याऐवोजी त्यांना महादु:खाच्या राशी देणारी बातमी माझ्याच्याने सांगणे कदापि होणार नाही. ह्यावर तू कदाचित विचारशील की जन्मभरात मी तुझी अवज्ञा कधीही केली नाही असे असताना तुझ्या अंत:कालच्या आज्ञेचे उल्लंघन मी का करू पाहतोय? तर त्याचं उत्तर असे की, तुझे अंत:कालचे श्रीमुख पाहणे ही माझ्यासाठी अत्यंत सुखदायक गोष्ट आहे. ते सोडून समस्त प्रजाजनांना दु:खदायक बातमी देण्यासाठी मी द्वारकेला कसा जाईन. माझ्या बोलण्याने त्यांना कुलनाशाचे घोर दु:ख आणि त्यावर कृष्णाच्या निधनाचे संतापजनक वृत्त समजेल आणि नेमकी हीच गोष्ट करायची माझ्या मनाची तयारी नाही. तुझी आज्ञा पाळायची तर जगाला महादु:ख द्यावे लागेल आणि जर तुझी आज्ञा पाळली नाही तर माझी रवानगी नरकात होईल.
क्रमश: