अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळली
बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकार अतिवृष्टी आणि दुष्काळपरिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरु केल्यामुळे कायदा व सुव्यवस्था संपूर्णरीत्या ढासळली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.आज बेळगाव सांब्रा विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते.
सरकारकडून अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि दुष्काळग्रस्त भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे. अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्यांना नुकसानभरपाई देखील तातडीने दिली जात नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे. मात्र त्यांना बी-बियाणे दिली जात नाही. शिवाय राज्यातील एकाही मंत्र्याने अशा भागाला भेट देऊन पाहणी केली नाही. मुख्यमंत्री केवळ आपल्या आमदारांची नाराजी दूर करण्यात व्यस्त आहेत. सरकारने तात्काळ अतिवृष्टीग्रस्ताना 10 हजार तर संपूर्ण घरे गमाविलेल्यांना 5 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी बसवराज बोम्मई यांनी केली आहे. तसेच सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरु केल्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढसाळल्याचा आरोप त्यांनी केला.
याप्रसंगी बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हा प्रमुख संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.