ऑनलाईन टीम / तरुण भारत :
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यावर चौफर टीका झाली. अनेक संघटनांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांना पदावरुन हटविण्याचीही मागणी केली. मात्र, त्यानंतरही कोश्यारींनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यावरुन राज्यातील वातावरण तापलं असतानाच आता कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून याबाबत आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली.
कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे की, माझ्या भाषणातील एक छोटा भाग काढून काही लोकांनी भांडवल केलं. मी म्हणालो की, मी शिकत असताना विद्यार्थी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांना आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेतच. मात्र, तरुण पिढी सध्याच्या काळातीलही काही आदर्श मानत असतेच. त्यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात, असं विधान मी केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आदर्श समोर असू शकतो. पण याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणं, असा होत नाही. माझ्या भाषणामध्ये तुलना करणे हा विषयच नव्हता.
अधिक वाचा : अनिल देशमुख यांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे आदर्श आहेत. शिवाजी महाराजांबाबत मी केलेल्या विधानाचा काही लोकांकडून विपर्यास करण्यात आला. महापुरुषांच्या अवमानाची कल्पना मी स्वप्नातही करू शकत नाही. मी माझ्या भाषणामधून वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगितला. अशा व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अवमान केला असे म्हणता येणार नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्याकडून कधी अनावधानाने चूक झालीच, तर तत्काळ खेद व्यक्त करणे किंवा क्षमायाचना करण्यास मी कधीच संकोच करीत नाही.
मुगल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, असं स्पष्टीकरण कोश्यारी यांनी या पत्रातून दिलं आहे.