प्रतिनिधी / सातारा :
रेशनचे धान्य मिळते ते इतरत्र कुठे जावू नये व निकृष्ठ धान्य मिळू नये, याकरता रेशनिंगच्या धान्य वितरण करणाऱ्या वाहनांना GPRS यंत्रणा बसवणे गरजेचे आहे. तसा शासनाचा आदेश असतानाही ठेकेदारांनी मनमानी कारभार करुन या आदेशाला हरपाळ फासला आहे. GPRS यंत्रणा न बसवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दि. 1 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत, असा इशारा निवेदनाद्वारे रिपाइंच्यावतीने देण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, सोमनाथ धोत्रे, गंगावणे, दीपक गाडे, विकास बैले आदी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेशनिंग पुरवठा करणाऱ्या वाहनांना GPRS यंत्रणा नाही. फिटनेस सर्टीफिकेट नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या बगलबच्च्यांच्या गोडाउनमध्ये वाहने खाली केली जातात. तिथून निकृष्ठ माल भरुन प्रत्येक गावात वितरण केले जाते. अशा प्रकारे त्यातील पोत्याची हेराफेरी व पोती काढून घेतली जातात. संबंधित ठेकदार मालामाल झाले असून, त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, बँकेचे रजिस्टर तपासण्यात यावे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा दि. 1 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.