दि. 4 ऐवजी 11 जून रोजी शक्य
प्रतिनिधी /पणजी
काही तांत्रिक अडचणी उदभवल्याने राज्यातील ग्राम पंचायत निवडणुका आणखी एक आठवडा लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे 4 जून ऐवजी आता त्या दि. 11 जून रोजी होतील असा अंदाज आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता कमीच आहे.
राज्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका 4 जून रोजी घेण्याचे ठरविले होते. त्या अनुषंगाने अधिसूचना काढण्यासाठीचा प्रस्तावही गेला होता, मात्र काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रस्ताव रोखून धरण्यात आला आहे. 4 जून ऐवजी आता दि. 11 जून रोजी या निवडणुका होतील.येत्या 14 जूनपर्यंत पंचायत निवडणूक प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची असल्याने शनिवार दि. 11 जून रोजी निवडणुका होऊ शकतात, अन्यथा रविवार दि. 12 जून रोजी देखील त्या होऊ शकतात.
प्रभागांच्या पुनर्रचनेस राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. त्याची अधिसूचना अद्याप जारी केलेली नाही. त्यानंतर लागलीच राखीवतेची अधिसूचनाही जारी करावयाची आहे. हे जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियाही 21 दिवसांची असणार त्यामुळे या साऱया प्रक्रियेस एकंदर लागणारा विलंब लक्षात घेऊन निवडणुका 1 आठवडाभर लांबणीवर पडणार हे निश्चित.