ऑनलाईन टीम/भारत
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात अभिवादन करण्यात आले. कोल्हापूरसह ग्रामीण भागातील जनतेने आज, शुक्रवार सकाळी १० वाजता आहे त्या ठिकाणी १०० सेकंद स्तब्ध उभे राहून मानवंदना देत कृतज्ञाता व्यक्त केली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या दूरदृष्टिकोनातून विकासबद्द केलेल्या करवीर संस्थांनामुळे आज शंभर वर्षानंतरही कोल्हापूर जिल्हा, कला-क्रीडा, पर्यटन आदी सर्व क्षेत्रात समृद्ध झाला आहे. या सर्व बाबीचे श्रेय फक्त आणि फक्त राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांना जाते. महाराजांनी दिलेल्या समतेच्या शिकवणीमुळे कोल्हापुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गविंदाने राहत आहेत. आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध करणाऱ्या लोकराजाला त्याच्या स्मृती शताब्दी निमित्त अभिवादन करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सरसावला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे यंदा स्मृती शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकराजा कृतज्ञता पर्वाचे आयोजन केले आहे. दि. १८ एप्रिल ते दि. २२ मेपर्यंत हे पर्व सुरू राहणार आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांद्वारे राजर्षींच्या विचारांचा जागर सुरू आहे. आज राजर्षा शाहू महाराज यांचा स्मृतिदिन असल्याने जिल्ह्यात आज सकाळी दहा वाजता आहे त्या ठिकाणी १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला तमाम जनतेने मानवंदना दिली.