ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना कोठडीत देण्यात आलेली वागणूक तसेच ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचारासंदर्भातील कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत. सोमय्या यांनी सकाळी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज मी दिल्लीत भाजप नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांना ठाकरे सरकारने दिलेली वागणूक आणि हवाला एन्ट्री ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी आणि उदय शंकर महावर यांच्या मनी लाँड्रिंगवरील कारवाईचा पाठपुरावा करणार आहे. ”
मातोश्रीवरील हनुमान चालीसा पठणाच्या हट्टानंतर घडलेल्या नाटय़मय घडामोडींनंतर राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. जवळपास 12 दिवस हे दाम्पत्य कोठडीत होते. नवनीत राणांना स्पाँडिलायसिसचा त्रास आधीपासूनच होता, मात्र त्यांना ज्या पद्धतीने फरशीवर झोपवलं, चौकशीसाठी बसवून ठेवलं, त्यामुळे त्यांचा त्रास बळावला. त्यांची कोठडीतून सुटका झाल्यानंतर त्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. काल त्यांची सोमय्या यांनी रुग्णालयात भेट घेतली. तेव्हा राणा दाम्पत्याचे कोठडीतील अनुभव ऐकून आपल्याला धक्का बसला. त्यावेळी मला इंग्रजांच्या काळातल्या तुरुंगाची आठवण झाल्याचं सोमय्या यांनी म्हटले होते. आज सोमय्या राणा दाम्पत्याचा हाच मुद्दा दिल्ली दरबारी मांडणार आहेत. तसेच ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचारासंदर्भातील कारवाईचा पाठपुरावा करणार आहेत.