विविध मंदिरांमध्ये धार्मिक विधी : बसवाण गल्लीत यात्रा-इंगळ्यांचा कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
नवी पालवी तरु तरुवर : दार उघडले चैत्राचे : स्वागत नूतन वर्षाचे
असे म्हणत शहर परिसरात गुढीपाडवा मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा झाला. घरोघरी उभारल्या गेलेल्या गुढींमुळे, पंचांग वाचनामुळे वातावरण मंगलमय झाले. हिंदु पंचांगानुसार गुढीपाडवा हा हिंदू वर्षाचा पहिला दिवस. तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असेही गुढी पाडव्याचे महत्त्व आहे. बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांपासूनच गुढी पाडव्याच्या साहित्याची खरेदी सुरू होती.
कडूनिंब, आंब्याच्या डहाळ्या, गुढीची काठी, रेशमी वस्त्र तसेच साखरेच्या माळा यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरांमध्ये आंब्याची पाने, कडुनिंबाची पाने व फुले घेऊन ग्रामीण भागातील विक्रेत्यांची गर्दी झाली होती. रेशमी वस्त्रावर तांब्या ठेवून कडूनिंब आणि आंब्याची पाने बांधून त्यावर साखरेची माळ चढवून पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली.
गुढींची उभारणी
गुढी पाडव्यानिमित्त मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य गल्ली, गाडेमार्ग शहापूर येथील लोकमान्य श्री राममंदिर येथे नवीन वर्ष गुढी पाडव्यानिमित्त बुधवारी मंदिरात श्रीराम, सीतामैय्या, लक्ष्मण, पवनपुत्र हनुमान यांच्या मूर्तींवर मंत्रपुष्प, अभिषेक घालण्यात आला. पुजारी चिदंबर ग्रामोपाध्ये यांच्या उपस्थितीत गुढी उभारून हे कार्यक्रम झाले.
जीवनविद्या मिशनच्यावतीने सायंकाळी 5 वाजता हरिपाठ, नामस्मरण, कीर्तन, प्रवचन झाले. सुषमा तांजी यांनी लोकमान्य राम मंदिर ट्रस्ट कमिटी तसेच युवा प्रबोधन मृणाल खनगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. मंदिराचे सेवेकरी सुधीर कालकुंद्रीकर, उमेश तांजी यांनी मृणाल खनगावकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी गोकुळ अकणोजी, सुधीर कालकुंद्रीकर, तानाजी पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला खासबाग, शहापूर, भारतनगर परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौड सारस्वत समाज, शहापूरतर्फे सकाळी 8 वाजता हनुमान मूर्तीची पूजा करून अभिषेक करण्यात आला. गुढी पूजन व ध्वज पूजन होऊन पंचांग वाचन झाले. वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिरमध्ये कोटी राम नाम जप यज्ञाला सुरुवात झाली.
बसवाण गल्ली येथे श्री बसवाण्णा देवस्थान समितीतर्फे गुढी पाडव्यानिमित्त आंबिल गाडे निघाले. गुरुवार दि. 23 रोजी बसवाण्णा यात्रा व इंगळ्या झाल्या. सामुदायिक गुगुळही झाले. विविध मंदिरांमध्ये सामूहिक पंचांग वाचन झाले. एकूणच शहर परिसरात गुढी पाडवा उत्साहाने साजरा झाला.
गुढी विजयाचे-प्रगतीचे प्रतीक
गुढी हे विजयाचे, प्रगतीचे प्रतीक मानले जाते. म्हणून तर गुढी उभारण्याची प्रथा रुढ झाली. गुढी उभारल्यानंतर विविध प्रकारच्या पक्वान्नांचा बेत घरोघरी झाला. पुरणपोळीचा नैवेद्य गुढीला दाखविण्यात आला. श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, रसमलाई अशा गोड पदार्थांचाही थाट उडाला. त्याचबरोबर सकाळपासूनच गुढीपाडव्याच्या शुभेच्छांची देवाणघेवाण समाज माध्यमांवर मुक्तपणे सुरू होती. यामध्ये काही अर्थपूर्ण कवितांचा आणि चारोळ्यांचाही समावेश होता.