शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : न्यायालयाचा अवमान होत असल्याचा आरोप ; कंत्राटदाराने सर्व साहित्य हलविले
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाने स्थगिती दिली असताना मंगळवारी पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱयांनी त्याला तीव्र विरोध केला होता. तरीदेखील काम सुरूच ठेवण्यात आले होते. शेतकऱयांनी याबाबत जिल्हाधिकाऱयांना बुधवारी निवेदन दिले. बेकायदेशीर सुरू असलेले काम थांबवावे, अशी मागणी केली. बुधवारी दुपारनंतर या रस्त्याचे काम थांबविण्यात आले असून तेथील सर्व साहित्य कंत्राटदाराने हलविले आहे. तसेच फौजफाटाही माघारी घेण्यात आला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाची स्थगिती असताना पुन्हा मच्छे गावाकडून हा रस्ता करण्यास सुरुवात करण्यात आली. मंगळवारी हा प्रकार समजताच शेतकऱयांनी त्याविरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी शेतकऱयांची धरपकड करून पोलीस स्थानकात नेले होते. प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी, पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांच्यासह पोलीस आणि कंत्राटदार घटनास्थळी दाखल झाले होते. रस्ता करण्यासाठी मच्छेजवळ असलेल्या ऊस पिकांमध्ये जेसीबी फिरविण्यात आला. रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती मच्छे, वडगाव, शहापूरसह परिसरातील शेतकऱयांना समजली. त्यानंतर शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. ‘न्यायालयीन स्थगिती असताना तुम्ही रस्ता कसा करत आहात?’ असा जाब विचारला. त्यावर ‘न्यायालयाने स्थगिती उठविली असून आम्हाला रस्ता करण्यास परवानगी दिली’ असे सांगून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.
यावेळी विरोध करणाऱया शेतकऱयांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्थानकात नेले. त्यामुळे शेतकऱयांच्या कुटुंबीयांनीही पोलीस स्थानकाकडे धाव घेतली. यावेळी पोलिसांबरोबर चांगलीच वादावादीदेखील झाली होती.
न्यायालयाचा एकप्रकारे अवमान
शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हाधिकाऱयांना जे काम सुरू आहे ते चुकीचे आहे. न्यायालयाने आम्हाला स्थगिती दिली आहे. तेव्हा त्याचा विचार करावा आणि न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावर जिल्हाधिकाऱयांनीदेखील न्यायालयाने स्थगिती उठविली आहे, असेच सांगितले. त्यावर शेतकऱयांनी खटल्याबाबत कोणत्याही प्रकारची सुनावणी झालेली नाही. असे असताना हे काम सुरू असल्याने हा न्यायालयाचा एकप्रकारे अवमान आहे, असे सांगितले.
बेळगाव येथील आठवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुनावणीचे काम झाले नाही, असे असताना रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता आम्ही त्याविरोधात पुन्हा लढा लढणार, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नाईक, मोनाप्पा बाळेकुंद्री, बाळकृष्ण सालगुंदी, राजू मरवे यांच्यासह इतर शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रांताधिकाऱयांविरोधात अवमान याचिका दाखल करणार
उच्च न्यायालयाने दावा निकाल लागेपर्यंत मनाई दिली आहे. शेतात पायदेखील ठेवायचा नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घातलेला दावादेखील फेटाळून लावला आहे. असे असताना शेतकऱयांच्या जमिनीत जाऊन पुन्हा हलगा-मच्छे बायपासचे काम सुरू केल्यानंतर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार आहे. तसेच आता प्रांताधिकाऱयांच्या विरोधातच अवमान याचिका दाखल करणार असल्याचे ऍड. रवीकुमार गोकाककर यांनी स्पष्ट केले आहे.