1 ऑक्टोबरपासून रणजी विजेत्या सौराष्ट्रविरुद्ध इराणी चषक लढत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तब्बल 3 वर्षांनंतर प्रथमच खेळवल्या जाणाऱया इराणी चषक लढतीसाठी शेष भारत संघ घोषित केला गेला असून या संघाचे नेतृत्व हनुमा विहारीकडे सोपवले गेले आहे. 2019-20 रणजी चषक विजेत्या सौराष्ट्रविरुद्ध शेष भारत संघ या स्पर्धेत आमनेसामने भिडेल. ही लढत दि. 1 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत राजकोट येथे होणार आहे. बीसीसीआयने यासाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला.
यापूर्वी दोन वर्षे कोव्हिड-19 पॅन्डेमिकमुळे इराणी चषक स्पर्धा खेळवली गेली नव्हती. शेष भारत संघात रेड-बॉल स्पेशालिस्ट मयांक अगरवाल, युवा फलंदाज प्रियांक पांचाळ यांचा समावेश आहे. प्रियांक पांचाळने यापूर्वी न्यूझीलंड अ विरुद्ध भारत अ संघाचे नेतृत्व सांभाळले होते. शिवाय, दुलीप चषक विजेत्या पश्चिम विभाग संघात त्याचा समावेश होता.
याशिवाय, या संघात यश धुल, यशस्वी जैस्वाल यांच्यासारखे दिग्गज युवा खेळाडू देखील समाविष्ट आहेत. जैस्वालने दुलीप चषक स्पर्धेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभागातर्फे द्विशतक साजरे केले. उदयोन्मुख वेगवान गोलंदाज उमरान मलिक, बिग-हिटिंग सर्फराज खान यांचाही शेष भारत संघात समावेश आहे. कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा या लढतीत सौराष्ट्रतर्फे खेळण्याची शक्यता आहे.
शेष भारत संघ ः हनुमा विहारी (कर्णधार), मयांक अगरवाल, प्रियांक पांचाळ, अभिमन्यू ईश्वरन, यश धुल, सर्फराज खान, यशस्वी जैस्वाल, केएस भरत, उपेंद्र यादव, जयंत यादव, सौरभ कुमार, आर. साई किशोर, मुकेश कुमार, उमरान मलिक, कुलदीप सेन, अरझान नागवासवल्ला.