चालू महिन्यात देशभर सरासरीच्या तुलनेत 109 टक्के पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आल्याने जुलै आणि ऑगस्टनंतर सप्टेंबर महिनाही पाऊसमय राहण्याची चिन्हे आहेत. भारतासारखा उष्णकटिबंधीय देश हा संपूर्णतः मोसमी पावसावर अवलंबून आहे. देशातील 60 ते 65 टक्के समाज आजही शेती वा शेतीपूरक बाबींवर निर्भर असून, मोसमी पावसाची वाटचाल, त्याचे प्रमाण या साऱयाचा परिणाम येथील कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो. यंदा पावसाची स्थिती चांगली असल्याने निश्चितच शेतीकडून अपेक्षा असतील. या वर्षी देशभरात 99 टक्के पाऊस होईल, असा अहवाल हवामान विभागाकडून आपल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजामध्ये देण्यात आला होता. त्यानंतर जून ते सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्षात 103 टक्क्यांपर्यंत पाऊस होईल, असा सुधारित अंदाज देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर जूनमध्ये पावसाने काहीशी ओढच दिली. जूनमध्ये देशात सर्वसाधारण 165.3 मिमी पाऊस होतो. किंबहुना अनेक भागांत पावसाने पाठ फिरविल्याने ही सरासरी गाठता आली नाही. सबंध देशात 152.3 म्हणजे उणे आठ टक्केच पर्जन्यमान नोंदविले गेल्याने धाकधूक वाढली होती. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर काही भागात दुबार पेरणी करण्याची वेळही शेतकऱयांवर ओढवली होती. मात्र, जूनमधील ही कसर पावसाने जुलै व ऑगस्टमध्ये भरून काढल्याने शेतकऱयांच्या मनातील चिंतेचे ढग दूर होण्यास मदत झाली. खरे तर जुलै महिना हा खऱया अर्थाने पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात तब्बल 327.7 मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या (280.5) 16.8 टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून येते. तर ऑगस्टमध्ये 263.7 मिमी पाऊस नोंदविण्यात आला असून, तो सरासरीच्या (254.9) 3.5 टक्के अधिक आहे. 1 जून ते 1 सप्टेंबर या तीन महिन्यांचा विचार करता या कालावधीत सर्वसाधारणपणे देशात सरासरीच्या 714.3 मिमी पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात आत्तापर्यंत 756.5 मिमी म्हणजेच 6 टक्के अधिकचा पाऊस झाल्याचे आकडेवारी सांगते. हे प्रमाण नक्कीच दिलासादायक म्हणता येईल. आता सप्टेंबरमध्येही पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये 167.9 मिमी इतका पाऊस होत असतो. या काळात 96 ते 104 टक्के पाऊस हा सर्वसाधारण मानला जातो. तथापि, 109 टक्क्यांवर पावसाचे भाकीत भारतीय हवामान विभागाने व्यक्त केल्याने हा महिना पाऊस गाजवणार, असे म्हणायला हरकत नाही. देशाच्या 30 ते 40 टक्के भागात सरासरीपेक्षा अधिक, तर 50 टक्के भागात सरासरीइतका पाऊस होईल, असे आयएमडीने म्हटले आहे. हे पाहता काही भागांत अतिवृष्टी होणार, हे गृहीत धरावे लागेल. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाच्या बहुतांश भांगात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर पश्चिम आणि दक्षिण उत्तर प्रदेश आणि उत्तर आणि वायव्य बिहारमधील पर्जन्य तूटही भरून निघू शकते. हे आशादायक चित्र म्हणता येईल. दुसऱया बाजूला मोसमी पावसाचा परतीचा प्रवास चालू वर्षी नियोजित वेळेआधीच सुरू होईल, असे प्रारंभी हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, तूर्त अशी शक्यता नाही. राजस्थानमधून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होण्याची स्थिती सध्या तरी निर्माण झालेली दिसत नाही, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा प्रवास नेमका कधी सुरू होणार, याकडे लक्ष ठेवावे लागेल. वास्तविक दरवर्षी ढगफुटी, अतिवृष्टी, महापुराच्या संकटाला देशाच्या वेगवेगळय़ा भागांना सामोरे जावे लागते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरलेले नाही. आता सप्टेंबर उजाडला म्हणजे पुराची भीती नसेल, असे मानण्याचे कारण नाही. पावसाचे प्रमाण कुठे, किती असेल, हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे. म्हणूनच सर्व शक्याशक्यता गृहीत धरून एनडीआरएफसह सर्व आपत्कालीन यंत्रणांना सज्ज रहावे लागेल. उत्तराखंड, सांगली, कोल्हापूर, चिपळूणसह विविध शहरांतील प्रलय मागच्या काही वर्षांत आपण अनुभवले आहेत. त्यातून धडा घेऊन या आपत्तीशी लढावे लागेल. सध्या आपल्या शेजारील पाकिस्तान पुराच्या आपत्तीत पार कोलमडून गेल्याचे दिसत आहे. येथील विनाशकारी महापुरात या देशाचा तब्बल एक तृतीयांश भाग जलमय झाला असून, येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाल्याचे पहायला मिळते. पुरात तब्बल 1100 जणांचे बळी गेले असून, घरे, पिके यांची अपरिमित हानी झाली आहे. 33 दशलक्ष नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे. याच पाकमधील कराची शहरात पाच वर्षांपूर्वी उष्णतेच्या लाटेत दोन हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा सारा हवामान बदलाचाच परिणाम असून, आगामी काळात यातून अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा हवामानतज्ञांकडून देण्यात आला आहे. भारत, पाकिस्तान, बांग्लादेशपासून ते यूरोप, अमेरिकेपर्यंत सगळय़ाच देशांनी अलीकडे निसर्गाचे रौद्ररुप काय असते, हे पाहिले आहे. म्हणूनच जागतिक तापमानवाढ वा हवामान बदलाच्या संकटाचा अधिक गांभीर्याने विचार करणे आता क्रमप्राप्त ठरते. जागतिक हवामान परिषदेत याविषयावर चर्चा झडतात, हे खरेच. तथापि, हरित वायू उत्सर्जनाच्या पातळीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी सर्वच देशांकडून पावले कशी पडतील, याचाही विचार व्हावा. या पातळीवर कोणतीही असमानता न ठेवता सर्वांना एकाच नियमांमध्ये बांधावे नि या आघाडीवर भरीव करण्यासाठी सर्वच राष्ट्रांनी कटिबद्ध रहावे. पुरादी आपत्तींचा सामना करावा लागला असला, तरी पाऊसपाण्याच्या दृष्टीने मागची काही वर्षे भारतासाररख्या देशाकरिता चांगली गेली आहेत. यंदाही महाराष्ट्रासह वेगवेगळय़ा राज्यांमधील प्रमुख धरणे काठोकाठ भरली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. असे असले, तरी काही भागांत शेतीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे बदलते हवामान, अतिवृष्टी, पावसातील खंड या सगळय़ाचा अभ्यास करून पीकपद्धतीतही काही बदल करावे लागतील. यंदा पावसाने कृपा केली. आता त्यातून शेतकऱयांसह सर्वांच्या जीवनात सुगीचे दिवस येवोत, हीच गणरायाचरणी प्रार्थना.
Previous Articleघटनेतून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द हटवा !
Next Article अर्थव्यवस्थेत भारताने ब्रिटनला टाकले मागे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.