कोल्हापूरात राष्ट्रवादीची उच्चांकी सभा होणार असून कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता राहू नये यासाठी सभा घेतली जात असल्याचे मत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्यांनी आज कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.
पहा VIDEO >>> कोल्हापूरात अजित पवार गटाची होणार उच्चांकी सभा; हसन मुश्रीफ यांचा दावा
अजित पवार यांची सभा कोल्हापूरात होत आहे. त्या सभेची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्यावर असून त्याची माहीती देण्यासाठी त्यांनी आज पत्रकारांना संबोधित केले. ते म्हणाले, “शरद पवार साहेबांची जिथे सभा होत आहे तिथे सभा घ्यायची नाही असे ठरले आहे. तरीही हि सभा त्यांच्या सभेला उत्तर नसून उच्चरदायित्वाची सभा आहे. ही सभा कोणाचाही कमीपणा दाखवण्यासाठी नाही तसेच सभेचा उद्देश कोणत्याही प्रकारच्या इर्षेचा नाही. कोल्हापूरात यापुर्वी कधीच झाली नाही अशी सभा होईल. ” असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारकडून राज्याच्या विकासाला निधी मिळण्यास सुलभता असल्याचे राज्याचा विकास होणार म्हणूनच आम्ही शिंदे- फडणवीस सरकार बरोबर गेलो आहे.”
इंडिया आघाडीवर भाष्य करताना ते म्हणाले, “विरोधी आघाडीच्या प्रयत्नांना यश येणार नाही. इंडियाच्या संयोजक पदासाठीच वादविवाद आहेत. याचा अर्थ पुढे काय होईल याचा विचार करा.” असेही ते म्हणाले. तसेच शिखर बँक आणि सिंचन प्रकरणाची चौकशी झालेली असून त्या त्या प्रकरणांमध्ये क्लिन चिट मिळालेली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागलेला असल्याचा खुलासाही त्यांनी केला.