उभ्या पिकात गव्यांचा कळप, शेतकरी हतबल, भरपाईची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेकिनकेरे येथील डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घालून ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. रात्रीच्या वेळी उभ्या पिकात हैदोस घालून पीक जमिनदोस्त केले आहे. वनविभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
डोंगर भागात वन्यप्राण्यांना पाणी आणि चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे प्राणी शिवारात येऊन पिकांचे नुकसान करू लागले आहेत. बेकिनकेरे येथील आण्णाप्पा राजगोळकर, नारायण किटवाडकर, केदारी भोगण आदी शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरवर्षी वन्यप्राण्यांकडून नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
बेकिनकेरे, बसुर्ते, कोनेवाडी, अतिवाड यासह चंदगड तालुक्यातील कौलगे, होसूर, सुंडी गावची शेतजमीन डोंगर पायथ्याशी आहे. या गावातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा फटका बसत आहे. सीमाहद्दीवर असलेल्या डोंगरात हे वन्यप्राणी वास्तव्य करतात आणि रात्रीच्यावेळी शिवारातील पिकांचे नुकसान करतात. हे चित्र मागील काही दिवसापासून सुरू आहे. सध्या बिन्स, ऊस, बटाटा यासह भाजीपाल्याचे नुकसान होऊ लागले आहे. उभ्या ऊस पिकात हैदास घालून गव्यांच्या कळपांनी मोठे नुकसान केले आहे. डोंगर परिसरात पाणी आणि चारा मिळत नसल्याने वन्यप्राणी शिवारात उतरु लागले आहेत. त्यामुळे डोंगर परिसरात वन्यप्राण्यांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे..