भूस्खलन घटनेला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जोशीमठ भूस्खलन आपत्तीसंबंधी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दर्शवला आहे. याप्रकरणी उत्तराखंड उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला केली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि जे. बी. परदीवाला यांच्या खंडपीठाने सोमवारी याप्रकरणी सुनावणी केली. जर याचिकाकर्त्यांना या संकटाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करायचे असेल तर ते उत्तराखंड उच्च न्यायालयात जाऊ शकतात, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्र सरकारला या संकटाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करून दुरुस्ती आणि स्थलांतराच्या कामात मदत करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच जोशीमठ येथील रहिवाशांना तात्काळ दिलासा देण्यात यावा, असे मतही मांडण्यात आले होते. यासोबतच तपोवन-विष्णुगड वीज प्रकल्पावर बंदी घालण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र, या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी याचिकाकर्त्याला उत्तराखंड उच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याची माहिती सुनावणीदरम्यान उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली.
सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिल्यानंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे वकील सुशील जैन आणि पी. एन. मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका ऐकावी अशी विनंती केली. परंतु पुनर्वसनासह तुम्ही मांडलेल्या मागण्यांसाठी तुम्ही उच्च न्यायालयात अर्ज करू शकता. तुम्ही अर्ज दाखल केला तर त्यावर लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती आम्ही उच्च न्यायालयाला करू शकतो, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. तेथील घरे, रस्ते आणि शेतात मोठमोठय़ा भेगा पडल्या आहेत. आतापर्यंत जोशीमठमधील शेकडो कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. जोशीमठ अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याचे सॅटेलाइट इमेजमधून दिसून आले आहे. 27 डिसेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान जोशीमठमध्ये 5.4 सेमी भूस्खलनाची नोंद झाली आहे. तसेच एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान जोशीमठमध्ये 9 सेंटीमीटरपर्यंत भूस्खलन झाले आहे.