शेतातील उभा ऊस आडवा, खरीप पीक पाण्यात, पावसाने जनजीवन विस्कळीत
अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात आठ दिवस झाले ढगाळ वातावरण असून काल ३ तारखेच्या मध्यरात्री पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातले. या दमदार पावसामुळे तालुक्यात पुन्हा एकदा नदी, नाले, ओढे तुडूंब भरुन वाहताना दिसून येत आहे. शेतकरी मात्र या पावसामुळे त्रस्त झाला आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यंदा तालुक्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सुरु झालेला पाऊस आज ही थांबण्याच्या मनस्थितीत नाही. दररोज दमदार पावसाबरोबर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतातील उभा ऊस आडवा होऊन पडला आहे. तर संपूर्ण खरीप पीक पाण्यात थांबल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहायला मिळत आहे. म्हणून बहुसंख्य शेतकरी सध्या पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे करताना दिसतात. काही भागात तर या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने अनेक गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काल एका रात्रीत बोरगाव बादोले शिवारात खूप मोठा पाऊस झाला आहे. शनिवारी रात्री तालुक्यात रात्री ११ वाजता सुरु झालेला पाऊस रात्री उशीरापर्यंत सुरुच होता. पावसा बरोबर वाऱ्याचा वेग अधिक असल्याने अनेक लोकांच्या घरावरील पत्रे उडाले तर अनेक गावातून वीज खंडित झाल्याने गावकऱ्यांना अख्खी रात्र अंधारातच काढावी लागली. तर अनेक कुटुंब जोरदार वाऱ्यासह पावसामुळे अख्खी रात्र जागून काढताना दिसून येत आहे.यापावसामुळे खरीप शेतकरी मात्र पुरती हैराण झाले आहेत. काल रात्री झालेल्या पावसामुळे किणी मंडळात शेत शिवारात सर्वत्र पाणीच पाणी साचलेले दृश्य पहावयास मिळाला.रविवारी सकाळपर्यंत ही नदी, नाले तुडूंब भरुन वाहत होते. यापूर्वी ही तालुक्यात मुबलक पाऊस झाला आहे.
खरीप पीक आता हाताशी लागणार की मातीमोल होणार या चिंतेने शेतकरी त्रस्त झाला आहे. काढणीस आलेल्या खरीप पिकात सध्या बर्याच ठिकाणी पाणी साचले आहेत, तर काही भागात उडीद, मूग, सोयाबीन पीक काढून शेतात ठेवले असताना आज जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण पीक पाण्यात गेले आहे. ऊस पट्ट्यातील ऊस मात्र या पावसामुळे भुईसपाट झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अजून ही पाच तारखेपर्यंत सतत पाऊस पडणार असल्याचे हवामान अंदाज वर्तविण्यात येत आहे.या हवामान अंदाजामुळे शेतकरी अधिकच चिंतातूर झाला आहे