शहरासह उपनगरांत पाणीच पाणी, दिवसभर अधूनमधून दमदार सरी
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने शनिवारी जोर धरला. त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. शनिवार असल्याने सकळची शाळा होती. मात्र विद्यार्थ्यांना पावसात भिजतच शाळा गाठावी लागली. शाळा सुटल्यानंतरही भिजतच घर गाठावे लागले. या पावसामुळे शहर व उपनगरांमधील सखल भागांमध्ये पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी गटारीत कचरा अडकून पाणी रस्त्यांवरून वाहत होते. त्यामुळे त्यामधून वाट काढताना साऱयांचीच कसरत होत होती.
शहरातील विविध रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे त्यामधून चालत जाताना आणि वाहने नेताना अडचण निर्माण होत होती. काही ठिकाणी गटारी भरून रस्त्यावरून पाणी वाहत होते. यामुळे गटारीतील कचरा रस्त्यांवर विखुरलेला होता. शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता. यामुळे पाण्याचा प्रवाहही वाढल्याचे दिसून आले. सखल भागांमध्ये अधिकच पाणी साचले होते. पाणी काढण्यासाठी साऱयांचीच धावपळ उडाली होती.
यावषी मान्सूनचे उशिराने आगमन झाले. त्यामुळे पावसासाठी धावा करावा लागण्याची चिन्हे दिसत होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आता पावसाने जोर धरला आहे. हवामान खात्याने तर येत्या तीन ते चार दिवसांमध्ये अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला असून यलो अलर्टही जारी केला आहे.
24 तासांत 11.2 मि.मी. पावसाची नोंद
शुक्रवारी सकाळी 8.30 ते शनिवारी सकाळी 8.30 पर्यंत 11.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरातील बसवेश्वर सर्कल, गांधीनगर येथील ब्रिज आदी परिसरात नेहमीप्रमाणे पाणी साचून होते. बाजारपेठेमध्येही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसामुळे भाजीविपेते, फेरीवाले आणि बैठय़ा व्यापाऱयांना मोठा त्रास सहन करावा लागला. भरपावसातच छत्री, रेनकोट व प्लास्टिकचा आधार घेत भाजीविक्री करावी लागत होती. खरेदीदारांनाही पावसापासून संरक्षण घेऊनच खरेदी करावी लागत होती. या पावसामुळे ग्रामीण भागातील शहराकडे येणारा ओढा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले.
शहरातील अनेक भागांमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत कामे सुरू आहेत. काही कामे अर्धवट आहेत. त्यामुळे त्याठिकाणी चिखल तसेच पाणी साचून होते. आनंदनगर, भाग्यनगर, समृद्धी कॉलनी या परिसरात अनेक ठिकाणी खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी चिखल तर काही ठिकाणी पाणी साचले होते. त्यामधून वाट काढताना कसरत करावी लागत होती. यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होत होता.