24 नव्या मंत्र्यांचा आज शपथविधी : पाचहून अधिक ज्येष्ठ आमदारांना संधी हुकली : पूर्ण प्रमाणात राज्य मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार : कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या बोसराजू यांना मंत्रिपद : आता खातेवाटपासाठी करावी लागणार कसरत
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित झाला आहे. मंत्र्यांच्या यादीला काँग्रेसश्रेष्ठींनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, धारवाड जिल्ह्यातील कलघटगीचे आमदार संतोष लाड यांच्यासह 24 नूतन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 11:45 वाजता बेंगळूरमधील राजभवन येथे नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे नूतन मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळात यापूर्वी 8 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. शनिवारी 24 मंत्री शपथग्रहण करतील. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 34 इतकी होईल. अशा रितीने पूर्ण प्रमाणातील मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल. सुरुवातीला 20 आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देऊन 4 जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, इच्छुकांची संख्या वाढल्याने पूर्ण प्रमाणात मंत्रिमंडळ अस्तित्वात आणले जात आहे. सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळात अनेक ज्येष्ठ आमदारांना संधी हुकली आहे. विधानपरिषद सदस्य बी. के. हरिप्रसाद, तुमकूर जिल्ह्यातील शिरा मतदारसंघाचे आमदार टी. बी. जयचंद्र, आमदार बसवराज रायरे•ाr, अप्पाजी नाडगौडा यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. दरम्यान, मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे चामराजनगर जिल्ह्यातील आमदार सी. पुट्टरंगशेट्टी यांना विधानसभेचे उपाध्यक्ष बनविण्यात येण्याची शक्यता आहे.
विनय कुलकर्णींनाही हुलकावणी
धारवाड मतदारसंघाचे आमदार विनय कुलकर्णी यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यांनी मंत्रिपदासाठी दिल्लीत हायकमांडवर दबाव आणण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. विनय कुलकर्णी हे लिंगायत समुदायातील असून त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. कुलकर्णी यांच्या समर्थकांनी त्यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी करत धारवाडच्या विवेकानंद सर्कलमध्ये रात्री आंदोलन केले.
सोनिया, राहुल गांधींची घेतली भेट
बुधवारी सायंकाळी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार नवी दिल्लीला गेले होते. गुरुवारी सायंकाळी नूतन मंत्र्यांची यादी निश्चित करण्यात आली. मात्र, काही आमदारांकडून मंत्रिपदासाठी दबाव आणण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा बैठकांचे सत्र सुरू झाले. सलग तीन दिवसांच्या कसरतीनंतर मंत्र्यांची यादी अंतिम करण्यात यश आले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची सिद्धरामय्या व शिवकुमार यांनी भेट घेतली. त्यांच्याशीही मंत्रिमंडळ विस्ताराविषयी उभय नेत्यांनी चर्चा केल्याचे समजते. नूतन मंत्र्यांच्या यादीला सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी चर्चेनंतर संमती दर्शविली आहे.
फोन करून मुख्यमंत्र्यांकडून माहिती
मंत्र्यांच्या यादीवर काँग्रेस हायकमांडकडून हिरवा कंदील मिळताच दिल्लीला गेलेले आमदार शुक्रवारी रात्री बेंगळूरला परतले. ज्या आमदारांना मंत्रिपदे मिळाली, त्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फोन करून माहिती दिली. तर मंत्रिपद न मिळालेल्यांना फोन केला नसल्याचे समजते. त्यामुळे हे आमदार नाराज होऊन परतले आहेत.
बी. के. हरिप्रसाद राजीनामा देणार?
कर्नाटक काँग्रेसमधील प्रभावी नेते आणि दिल्लीत हायकमांड पातळीवर राजकीय वजन असणारे बी. के. हरिप्रसाद यांनाही मंत्रिपद मिळालेले नाही. विधानपरिषदेतून त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा होती. परंतु, मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्याचे सुत्रांकडून समजते.
शिवकुमारांकडून वजनदार खात्याची मागणी?
मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी दिल्लीत चर्चा सुरू असतानाच सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात आपल्या समर्थकांना वजनदार खाती मिळवून देण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. शिवकुमार यांनी वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे आपल्या निकटवर्तीय आमदारांना पाच प्रमुख खाती देण्याची मागणी केली. बेंगळूर शहर विकास, पाटबंधारे, ऊर्जा, गृह, ग्रामविकास आणि पंचायतराज या खात्यांची त्यांनी मागणी केली आहे. यापैकी शिवकुमारांनी स्वत:कडे पाटबंधारे आणि बेंगळूर शहर विकास खाते देण्याची मागणी केल्याचे समजते.
नूतन मंत्री जिल्हा/मतदारसंघ
- 1. कृष्णभैरेगौडा बेंगळूर (बॅटरायनपूर)
- 2. दिनेश गुंडूराव बेंगळूर (गांधीनगर)
- 3. संतोष लाड धारवाड (कलघटगी)
- 4. डॉ. एम. सी. सुधाकर कोलार (चिंतामणी)
- 5. लक्ष्मी हेब्बाळकर बेळगाव (बेळगाव ग्रामीण)
- 6. डॉ. शरणप्रकाश पाटील कलबुर्गी (सेडम)
- 7. एच. के. पाटील गदग (गदग)
- 8. ईश्वर खंडे बिदर (भालकी)
- 9. रहिम खान बिदर (बिदर उत्तर)
- 10. बी. नागेंद्र बळ्ळारी (बळ्ळारी ग्रामीण)
- 11. के. वेंकटेश म्हैसूर (पिरियापट्टण)
- 12. मंकाळू वैद्य कारवार (भटकळ)
- 13. मधु बंगारप्पा शिमोगा (सोरब)
- 14. एन. एस. बोसराजू रायचूर
- 15. के. एन. राजण्णा तुमकूर (मधुगिरी)
- 16. शरणबसप्पा दर्शनापूर यादगिरी (शहापूर)
- 17. शिवानंद पाटील विजापूर (बसवन बागेवाडी)
- 18. भैरती सुरेश बेंगळूर (हेब्बाळ)
- 19. एस. एस. मल्लिकार्जुन दावणगेरे (दावणगेरे उत्तर)
- 20. डी. सुधाकर चित्रदुर्ग (हिरियुर)
- 21. चेलुरायस्वामी मंड्या (नागमंगल)
- 22. शिवराज तंगडगी कोप्पळ (कनकगिरी)
- 23. आर. बी. तिम्मापूर बागलकोट (मुधोळ)
- 24. डॉ. एच. सी. महादेवप्पा म्हैसूर (टी. नरसीपूर)
जातनिहाय मंत्रिपदांची आकडेवारी
मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आठ मंत्री अशा 10 जणांचा समावेश यापूर्वीच झाला आहे. शनिवारी 24 मंत्री शपथबद्ध होतील. त्यामुळे 34 जणांचे पूर्णप्रमाणातील मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळात जिल्ह्यापेक्षा जातीय समीकरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. लिंगायत समुदायाला 7, वक्कलिक समुदायातील 5 जणांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. तर अनुसूचित जातीतून 6 तर अनुसूचित जमातीमधून तिघे मंत्रिमंडळात आहेत. मुस्लीम समुदायातून दोघांना, ख्रिश्चन समुदायातील एकाला, जैन आणि ब्राह्मण समुदायातून एकाला संधी मिळाली आहे. मराठा समुदायातून संतोष लाड हे एकमेव मंत्री बनतील. मागासवर्गातून कुरुब समुयातील दोघे, राज क्षत्रिय समुदाय, बेस्त आणि ईडीग (बिल्लव) समुदायातून प्रत्येकी एकाला मंत्रिपद मिळाले आहे.