अंतिम लढतीत दक्षिण कोरियन संघावर 2-1 ने मात : हॉकी इंडियाकडून कौतुकाचा वर्षाव
वृत्तसंस्था/ काकामिगारा (जपान)
भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. या संघाने ज्युनियर महिला आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. भारताने प्रथमच या स्पर्धेवर नाव कोरले आहे. अंतिम फेरीत टीम इंडियासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान होते. भारताने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाने सर्वाधिक 4 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा 2021 मध्येच होणार होती पण कोरोनामुळे ती दोन वर्षांच्या विलंबाने खेळवली गेली. विशेष म्हणजे, स्पर्धेत भारताच्या अनुने सर्वाधिक 9 गोल नोंदवले.
या स्पर्धेच्या सुरुवातीपासून भारतीय महिला संघाची कामगिरी शानदार राहिली. सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा 22-0 असा धुव्वा उडवला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात मलेशियाला 2-1 असे तर तिसऱ्या सामन्यात चिनी तैपेईचा 11-0 असा फडशा पाडला होता. यानंतर उपांत्य फेरीत जपानला 1-0 असे नमवत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीतही भारतीय महिलांनी आपला धडाका कायम ठेवला. प्रारंभापासून आक्रमक खेळणाऱ्या भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल न करता आल्यामुळे या सत्रात 0-0 अशी स्थिती होती. दुसऱ्या सत्रात मात्र भारतीय संघाला गोल करण्याची संधी मिळाली. 22 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर अनुने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अर्थात, भारतीय संघाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. 25 व्या मिनिटाला कोरियाच्या सियोनने शानदार गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यामुळे मध्यंतरापर्यंत ही बरोबरी कायम होती.
यानंतर, तिसऱ्या सत्रात 41 व्या मिनिटाला नीलमने शानदार गोल करत भारतीय संघाला 2-1 असे आघाडीवर नेले. या गोलमुळे भारतीय संघाच्या तंबूत एकच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. चौथ्या सत्रात कोरियन संघाला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण यातील एकाही पेनल्टीवर गोल करता आला नाही. अखेरपर्यंत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी कायम ठेवत विजयाला गवसणी घातली. याआधी, भारताने 2012 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण अंतिम सामन्यात चीनकडून 5-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा मात्र भारतीय महिलांनी धडाकेबाज कामगिरी करत जेतेपद खेचून आणले.
हॉकी इंडियाकडून कौतुकाचा वर्षाव
दरम्यान, रविवारी भारतीय महिलांनी पहिलेवाहिले आशिया चषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर हॉकी इंडियाने खेळाडूंचे विशेष कौतुक केले आहे. याशिवाय, प्रत्येक खेळाडूला दोन लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच सहायक कर्मचाऱ्यांना एक लाख रुपये दिले जाणार असल्याचे हॉकी इंडियाकडून सांगण्यात आले.