विटाने भरलेला ट्रॅक्टर बुलेरोत घुसला
प्रतिनिधी / मिरज
शहरातील राजीवगांधीनगर येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरो चार चाकी आणि विटाने भरलेला ट्रॅक्टर यांचा भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. एकाच बोलेरोमध्ये सात जण असल्याची माहिती मिळत आहे. मयतामध्ये एक महिला, बालकाचा समावेश आहे. सर्व मयत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहेत. यामध्ये सोहम पवार (वय १२), जयवंत पवार, (वय ४५ ), कोमल शिंदे (वय ६०), लखन शिंदे (वय ६०) (सर्व रा. सरवडे, ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) हे मयत झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, रत्नागिरी नागपूर या रस्त्याचा बायपास रस्ता दोन दिवसापूर्वी सुरु झाला असून सदर या बायपास रस्त्यावर राजीव गांधी नगर या ठिकाणी विटांनी भरलेली ट्रॉली विरोधी दिशेने आल्याने बुलेरो MH 09 DA 4912 गाडीने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बुलेरो गाडीतील तीन पुरुष एक महिला व एका बारा वर्षाच्या मुलाच्या जागीच मृत्यू झाला आहे. मयत पाच जण हे राधानगरी तालुक्यातील आहेत. तर या अपघातात तीन जण जखमी झाले असून एका जखमी महिलेची स्थिती गंभीर आहे. जखमी तिघांच्या वर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अपघातस्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक अजित टीके, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देशमुख, महात्मा गांधी चौकीचे भालेराव यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.